नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
नर्मदा नदी किनाऱ्यावरील अक्कलकुवा तालुक्यातील चिमलखेडी परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे शेती व घरांचे नुकसान तर झालेच आहे. परंतु शेतकरी हुंदा वळवी यांच्या दोन जनावरांवर वीज पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्याला महसूल विभागाने पंचनामे करून शासकीय मदत द्यावी अशी मागणी नूरजी वळवी व नागरिकांनी केली आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकं व इतर मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी पंचनामे करणे आवश्यक आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून शासकीय कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजनेसाठी संप सुरू असल्याने पंचनामे होत नसून शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहे.