नंदूरबार l प्रतिनिधी
कृषी विभाग, शासन निर्णय अन्वये महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय, नंदुरबार मार्फत “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” हा उपक्रम आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याच्या नंदुरबार व नवापूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पश्चिम घाटाच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी लोकवस्ती असलेल्या शितलपाडा खोलघर, वांजाळे, केवडीपाडा, सूतारे या गावात राबविण्यात आला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. यु. बी.होले, प्रा. दिनेश सुर्यवंशी, प्रा. साहेबराव पाटोले, प्रा. अमर लोखंडे सहाय्यक प्राध्यापक यांनी शेतकऱ्यानं समवेत दिवसभर चर्चा करून मार्गदर्शन केले व दिवसभरातील आदिवासी शेतकऱ्याची दिनचर्या जाणून अडचणी समजून घेतल्या.
याप्रसंगी एकात्मिक शेती व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, जमिनीचे आरोग्य, शासनाच्या विविध योजना, फायदेशीर शेतीची तत्वे, शेतकरी उत्पादक कंपनी याविषयी आदिवासी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. परिसरात पिक परिस्थिती चागली असून खरीप हंगाम संपल्यावर पाण्याची टंचाई भासते यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे याबाबत शेतकऱ्यांनी अडचण मांडली यावेळी शिवार फेरीत गावातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.