नंदुरबार । प्रतिनिधी-
महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष एकसंघ असल्याने पुढील महिन्यात होणार्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, सभापती निवडीप्रसंगी महाविकास आघाडीचीच सत्ता राहील, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.शिरीषकुमार नाईक व शिवसेनेचे नेते यांनी संयुक्त पत्रान्वये दिले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जुलै महिन्यात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींची निवड करण्यात येणार आहे.
या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीतील जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय नेत्यांशी चर्चा करुन पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व पंचायत समिती सभापती, उपसभापतीची निवड करतांना महाविकास आघाडी म्हणूनच सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता तीनही पक्ष अॅड.के.सी.पाडवी यांच्या नेतृत्वाखाली काम करतील, अशी ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी हे महाविकास आघाडीचेच होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.