नवापूर l प्रतिनिधी
नॅशनल हायवेने सुरु केलेल्या कामातील मातीचे ढिगारे रंगावली नदी पात्रात साचले असुन पुर आल्यास रंगावली नदीचे पाणी नवापूर शहरात घुसण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे संबधित कंपनीने नदीतील माती, वाळू काढून रंगावली नदीचे खोल व स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नवापूर शहरालगत नॅशनल हायवे ६ चे काम प्रगती पथावर सुरु असुन नवापूर शहरातील देवळफळी भागाकडे रंगावली नदीवर पुल बांधण्याचे काम सुरु आहे.
या नॅशनल हायवेचे काम म्हात्रे कंपनीने हाती घेतले आहे मात्र या पुलाचे काम सुरु असताना बारामाही वाहणारी नवापूरची जिवनदायीनी रंगावली नदी मध्ये मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करुन दिल्यामुळे नदीचे पात्र नष्ट होण्याचा मार्गावर आहे. रंगावली नदीला गेल्या काही वर्षापासुन पावसाळ्यात मोठ पुर येतो.
पुलाचा कामातील भरावामुळे रंगावली नदीचे पाणी रंगावली नदी किनारी राहाणार्या लोक वस्तीत जाऊन प्रचंड प्रमाणात नुकसान होणाची दाट शक्यता आहे.पुल बांधत असतांना त्या कामातील माती व जवळच असलेल्या टेकड्यावरील माती रंगावली नदीत जाऊन नदी पात्र बुजत आहे.यामुळे नवापूर प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
या पुलाचे बांधकाम सुरु आहे तर काही अंतरावर नवापूर शहराला पाणी पुरवठा करणारा केटीवेअर बंधारा आहे.यामुळे मातीचा भरावामुळे बंधारा फुटुण्याची दाट शक्यता आहे.नाकारता येत नाही. नवापूर शहरातील नागरिकांनी यावर संभाव्य धोका लक्षात आणून दिला आहे याकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. हा गंभीर धोका लक्षात घेऊन रंगावली नदीतील माती, वाळू काढून रंगावली नदी खोल व स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.