नंदुरबार l प्रतिनिधी-
श्रीमती क.पु.पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर येथे मराठी साहित्यसृष्टीतील थोर कवी, नाटककार व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन अत्यंत उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये भाषेची आवड निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी का. वि. प्र. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालक संतोष अहिरे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठी भाषेचा गौरव करत तिच्या समृद्ध परंपरेची आठवण करून दिली.
या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका सौ. की. व्ही. पाटील, सौ. एस. पी. पाटील, प्रा. श्रीमती सविता पाटील, श्रीमती मोनिका पाटील तसेच प्रा. सौ. शैला गिरासे उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची लाभली.
कार्यक्रमात इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनी रिया पाटील, वेदिका पाटील, चैताली पाटील, प्राजक्ता पाटील, पल्लवी मराठी, प्रणाली सोनार, चिन्मय भिल व भारती पाटील या विद्यार्थिनींनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारी नाटिका सादर केली. त्यांच्या सादरीकरणातून मराठी भाषेची गोडी, अभिव्यक्तीची ताकद आणि सांस्कृतिक वारसा प्रभावीपणे प्रकट झाला. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
मराठी दिनानिमित्त भाषण व काव्य गायन करताना इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी जानवी पाटील, वेदिका पाटील व ईशा पाटील यांनी मराठी भाषेचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करणारी प्रेरणादायी भाषणे केली.
तसेच कावेरी पाटील, कोमल पाटील व वेदिका पाटील यांनी काव्यगायन सादर करून सभागृहात साहित्यिक वातावरण निर्माण केले.
कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक एम. आर. पाटील यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून आपल्या संस्कृतीची ओळख आहे, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी मराठीचा अभिमान बाळगून तिचा वापर दैनंदिन जीवनात वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. एस. पाटील यांनी केले. त्यांनी संपूर्ण कार्यक्रम आकर्षक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला. आभार प्रदर्शन प्रा.सौ.अमिता मगरे यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. दिपाली धनगर, प्राध्यापक उमेश सोनवणे व ग्रंथपाल नाना पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान, प्रेम आणि जाणीव निर्माण करणारा ठरला. “मराठी ही आपल्या ओळखीची शान आहे,” हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.








