लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय
नंदुरबार l प्रतिनिधी-
राजकारणात मानपद आणि आर्थिक लाभासाठी चढाओढ सुरू असताना, नंदुरबार तालुक्यातील भालेर ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवला आहे. भालेरच्या सरपंच कविता चंद्रशेखर पाटील यांनी आपले सरपंच पदाचे मानधन घेण्यास नम्रपणे नकार दिला असून, हे मानधन शासकीय खात्यात परत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कविता पाटील ७ मे २०२५ पासून सरपंच पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. या पदावर कार्यरत असताना मिळणारे मानधन त्यांनी स्वीकारलेले नाही. हे साठलेले मानधन आणि यापुढील मानधन शासकीय तिजोरीत जमा व्हावे, यासाठी त्यांनी नंदुरबारचे गटविकास अधिकारी एस. डी. पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले आहे.
सरपंच पदाच्या कार्यकाळातील आतापर्यंतचे सर्व मानधन आदरपूर्वक नाकारले आहे. हे मानधन परत करण्यासाठी योग्य तो ‘शासकीय खाते क्रमांक’ (Government Account Number) उपलब्ध करून देण्याची विनंती प्रशासनाला केली आहे. यापुढेही सरपंच पदाचे मानधन माझ्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करू नये, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
आजच्या काळात जिथे मानधनात वाढ करण्याची मागणी होत असते, तिथे भालेरच्या महिला सरपंचांनी दाखवलेली ही निस्वार्थी वृत्ती कौतुकास्पद ठरत आहे. त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात त्यांच्या कार्याची आणि विचारांची चर्चा होत असून, इतर लोकप्रतिनिधींसाठी हा एक वस्तुपाठ ठरला आहे.
“सरपंच पद ही जनतेची सेवा करण्याची संधी आहे, पगार घेण्याचे साधन नाही. हे मानधन सरकारी कामासाठी किंवा समाजोपयोगी कार्यासाठी वापरले जावे, हीच माझी इच्छा आहे.”
— कविता पाटील, सरपंच, भालेर.







