नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत कडक नियोजन आखले आहे. परीक्षा काळात ड्रोन, सीसीटीव्ही, मोबाईल चित्रीकरण, भरारी पथके, पोलीस बंदोबस्त, झेरॉक्स केंद्रांवर निर्बंध आणि १४४ कलमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व नाशिक विभागीय मंडळाच्या निर्देशानुसार दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता समिती, नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत परीक्षा नियोजन, सुरक्षा, सुविधा आणि कॉपीमुक्त परीक्षा यावर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या सुरुवातीस शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भानुदास रोकडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून परीक्षेची सविस्तर माहिती सादर केली. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, महावितरणचे कार्यकारी अभियंता, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आदी अधिकारी उपस्थित होते.
यंदा बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत २८ केंद्रांवर होणार असून १८ हजार ११५ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान ५० परीक्षा केंद्रांवर २१ हजार २३९ विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी ८ कस्टडी (परीरक्षक) केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कॉपीसारखे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर किमान तीन सदस्यांचे बैठे पथक नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांचा समावेश असलेली भरारी पथके कार्यरत राहणार आहेत. महत्त्वाच्या पेपरांच्या दिवशी अधिकाऱ्यांची पूर्णवेळ उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे, सीसीटीव्हीद्वारे तसेच जिथे सीसीटीव्ही उपलब्ध नाही तेथे मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरणला विशेष दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी पुरेशी बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृह आणि स्वच्छ परिसर सक्तीचा करण्यात आला आहे.
कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित पर्यवेक्षक, केंद्र संचालक तसेच विद्यार्थ्यांवर थेट व कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. परीक्षा काळात परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्यात येणार असून १०० मीटर परिसरात पालकांना प्रवेशास मनाई राहणार आहे.
संवेदनशील व उपद्रवी केंद्रांवर अतिरिक्त पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात येणार असून अशा केंद्रांवरील केंद्र संचालक व मुख्याध्यापकांची स्वतंत्र बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षण विभागाने पोलीस प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून कोणतीही अनुचित घटना घडू नये, अशी खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सूचनांनुसार काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी सर्वांचे आभार मानून बैठक संपल्याचे जाहीर केले.
परीक्षा एक नजरेत
• बारावी परीक्षा : १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६
• केंद्रे : २८ | विद्यार्थी : १८,११५
• दहावी परीक्षा : २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६
• केंद्रे : ५० | विद्यार्थी : २१,२३९
• कस्टडी (परीरक्षक) केंद्रे : ०८
कॉपीखोरांवर कडक कारवाई
ड्रोन, CCTV, मोबाईल चित्रीकरण
१४४ कलमाची कडक अंमलबजावणी
२०० मीटर परिसरात झेरॉक्स बंद
१०० मीटर परिसरात पालकांना बंदी
मोबाईल, कॅलक्युलेटर, पेजरवर बंदी
प्रत्येक केंद्रावर पोलीस व होमगार्ड
दोषींवर थेट व कठोर कारवाई








