नंदुरबार l प्रतिनिधी-
2026-27 चा केंद्रीय अर्थसंकल्प समस्त भारताला आत्मनिर्भरच नव्हे तर गतिमान करणारा असून आपला भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनत असल्याचा विश्वास देणारा आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सितारामन यांनी अत्यंत कौशल्याने सामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या तरतुदी केल्या आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था गडगडली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय भाजपा सरकार मात्र प्रत्येक घटकाला आर्थिक ऊर्जा देण्यात यशस्वी होताना दिसत आहे; याचा मोठा अभिमान वाटतो असे माजी खा. डॉ.हिना गावित यांनी सांगितले.
2014 मधील कमकुवत अर्थव्यवस्थेपासून ते 2026 च्या सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपर्यंतचा मोठा टप्पा आज देशाने गाठला आहे. देशाचा विकास दर सुमारे 7 टक्के राहिला असून, गरिबी कमी करण्यात आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यात आपल्याला मोठे यश मिळाले आहे.
सबका साथ, सबका विकास विकासाचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवणे यांच्या नेतृत्वात शक्य झाले. युवकांना केंद्रस्थानी ठेवून सुधारणा एक्सप्रेस राबवण्यात येत आहे ज्यामुळे आयटी आणि एअर क्षेत्रासारख्या नवतंत्रज्ञानाला चालना मिळाली. आजच्या अर्थसंकल्पातील काही ठळक तरतुदी लक्षात घेण्यासारख्या आहेत. जसे की, एमएसएमइ स्तरावरील लहान उद्योजकांसाठी 10 हजार कोटी रुपयांचा विकास निधी देण्याची तरतूद आहे.
शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक एआय टूल विकसित करण्यासोबतच नवीन योजना लागू केल्या जाणार आहेत. गृहिणी आणि उद्योजक महिलांसाठी सुद्धा विशेष तरतुदी समाविष्ट आहेत. पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला चालना देण्यासाठी, महत्त्त्वाच्या शहरांना जोडणारे 7 हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर्स विकसित केले जातील, ज्यात महाराष्ट्रातील पुणे-मुंबई कॉरिडॉरची निर्मिती केली जाईल.
ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाद्वारे आरोग्यसेवा या अंगाने सुद्धा मोठा निर्णय झाला आहे. यामध्ये तीन नवीन राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्थांची स्थापना करणे, बायोफार्मा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे आणि विद्यमान सात संस्थांचे अपग्रेड आणि विस्तार करणे समाविष्ट आहे.1000 हून अधिक मान्यताप्राप्त भारतातील क्लिनिकल चाचणी स्थळांचे नेटवर्क तयार करण्यात येणार आहे. कर दात्यांना सुद्धा समाधान देण्यात आले आहे.
प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारले जाणार असल्याची मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याचा आपल्या नंदुरबार जिल्ह्यालाही लाभ होऊ शकतो. गुजरातच्या जामनगरमध्ये वैश्विक आयुवैदिक केंद्र उभारणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली. या अर्थसंकल्पात कॅन्सर आणि मधुमेहाची आैषधे स्वस्त करण्यात आली आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल. अशा प्रकारच्या काही तरतुदी नक्कीच नंदुरबार जिल्ह्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभदायक ठरतील. आपल्या नंदुरबार जिल्ह्यासाठी काय लाभ झाले यावर अर्थसंकल्पातील तरतुदींच्या डिटेल्स हाती आल्यानंतर अधिक सांगू शकेल.
तथापि केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांच्या शब्दात सांगायचे तर, मोदी सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमुळे भक्कम व्यापक आर्थिक स्थैर्य सुनिश्चित झाले आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक स्थिर अर्थव्यस्था देण्यात मोदी सरकार यशस्वी झाले आहे.








