नंदुरबार l प्रतिनिधी
आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी, डॉक्टर हे गेल्या अनेक वर्षापासुन काम करीत असून कोरोना काळातही जीवाची परवा न करता २४ तास काम केले. या आरोग्य कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसह सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी गेल्या २६ दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीतर्फे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केला परंतु अद्यापही दखल घेतली नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी परिचारिका, शहरी ग्रामीण एएनएम, जीएनएम, एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व एनयुएचएम अंतर्गत कार्यरत तसेच कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रिक्त पदावर समायोजन करण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरु आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ३० ऑक्टोबर रोजी ३० टक्के कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचे आश्वासन आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनानंतर दिले होते. मात्र अद्याप त्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यभरात आंदोलन सुरु करण्यात आले. याबाबत नंदुरबार येथील जिल्हा प्रशासनालाही राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीतर्फे निवेदन देण्यात आले आहे. मात्र अद्यापही दखल घेतली नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातही येत्या काही दिवसात साखळी उपोषणासह थाळीनाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.








