शहादा l प्रतिनिधी
शासन आपल्या दारी मोहिमेत तालुक्यातील प्रत्येक लाभार्थ्याला पात्रतेनुसार योजनांचा लाभ देण्यात येणार असून एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन शहाद्याचे तहसीलदार दिपक गिरासे यांनी केले आहे.
ते आज शहादा तहसील कार्यालयात आयोजित शासन आपल्या दारी मोहिमेच्या शिबिरात लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, तालुका कृषी अधिकारी किशार हडपे, नायब तहसीलदार श्री.साळवे, श्री. धनगर व सर्व मंडळ अधिकारी तसेच विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसीलदार श्री. गिरासे म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रमांत जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलीयर, डोमिसाईल, पोट खराब क्षेत्र वहिती लायक बाबतचे आदेश, संजय गांधी निराधार योजना लाभार्थी, इंदिरा गांधी योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय अर्थिक सहाय्य योजना, रेशन कार्ड या सारख्या दाखल्यांचे वितरण करण्यात येणार असून येत्या महिनाभरात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वाने पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार असल्याचेही यावेळी तहसीलदार श्री. गिरासे यांनी सांगितले.
या शिबिरास मोठ्या प्रमाणात शेतकरी, लाभार्थी, कर्मचारी उपस्थित होते. एकूण 300 लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आल्याचेही तहसीलदार गिरासे यांनी यावेळी सांगितले.








