नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात ८०० च्या वर बोगस घरकुल असून त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना सांगितले.
नंदुरबार जि.प.स्थायी समिती सभा याहामोगी सभागृहात जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सभापती गणेश पराडके, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य व जि.प. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.यावेळी सभेत नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे येथील आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी गेलेल्या एका आदिवासी महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांच्या चौकशी समितीने अहवाल सादर केला असून तो आम्हाला अमान्य असल्याचे जि.प.चे सभागृह विरोध पक्षनेते रतन पाडवी यांनी केला.याप्रकरणी पुन्हा चौकशीची मागणी केली.यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित पुन्हा चौकशी समिती स्थापन करून चौकशी करण्याचे मान्य केले.
दरम्यान जि. प.सदस्य रतन पाडवी , सी.के.पाडवी, विजयसिंह पराडके यांनी सातपुड्यात अनेक गावांमध्ये विहिरी मंजूर झाल्या असून त्या अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याचे सांगत तेथे नुसते खड्डे खोदले असल्याचे सांगत बांधकामासाठी तापीच्या वाळू ऐवजी तेथील नदीची वाळू वापरण्यात येत असल्याचे सांगत.संबधित अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले.यावेळी पाणी पुरवठा अभियंता यांनी
सांगितले की.जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत ८६० पैकी ५८९ कामे सुरू झाली आहेत.सुरवातीला यात ४८३ जणांना नोटिसा देण्यात आल्या.दुसऱ्या वेळेस २७१ कामांना नोटीस देण्यात आल्या तर २७ जणांना दंडाची नोटीस देण्यात आल्याचे सांगितले.
दरम्यान मागील महिन्यात जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात भरती प्रक्रियेत पेसा अंतर्गत भरती झाली नाही.स्थानिक उमेदवारांना डावलून भरती झाल्याचे सांगत सदर भरतीला स्थगिती देण्याची मागणी रतन पाडवी यांनी केली.
दरम्यान यावेळी जिला परिषद सदस्य रतन पाडवी यांनी जिल्ह्यातील बोगस घरकुल बाबत प्रश्न विचारला त्यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले की, जिल्हातील ३० हजार घरांची तपासणी करण्यात आली असून ७९ गावांमधून घरकुल बाबत तक्रार प्राप्त झाली आहे.त्याच चौकशीअंती २७३ घरकुल संशयास्पद आढळले आहेत.
यात पुन्हा चौकशी केली असता २२५ घरकुले खरी आढळली तर ३५० घरकुले संशयास्पद असून सुमारे ८०० च्या वर घरकुले बोगस आढळली असून त्यांना नोटीस देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.दरम्यान बिजगाव येथे तर सरपंच त्याची पत्नी व मुलगा हे घरकुलाचे लाभार्थी असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी विविध विभागांचा आढावा घेण्यात आला.मनरेगा अंतर्गत पुढील महिन्यात सुमारे ६ हजार कामे सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी अधिकाऱ्याने सांगितले.








