जळगाव l प्रतिनिधी
– ज्याप्रमाणे हिंदुत्वाची चळवळ वाढत आहे, त्याचप्रमाणे हिंदूविरोधी कारवाया वाढत आहेत. आज देशात बहुसंख्य हिंदू असतांना हिंदूंच्या सणांच्या मिरवणुकांवर दगडफेक केली जाते. कायदा हातात घेतला जातो. गुन्हे मात्र हिंदूंवर दाखल केले जातात, हे चिंतनीय आहे. हिंदु विरोधी कारवायांत सेक्युलर, इस्लामिक, ख्रिस्ती मिशनरी आणि कम्युनिस्ट यांची अभद्र युती अग्रेसर आहे. त्यामुळे पुढील पिढीच्या अस्तित्वासाठी गावागावात ग्रामरक्षा दल स्थापन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. ते अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात बोलत होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २३ एप्रिल या दिवशी हॉटेल क्रेझी होम येथे पार पडलेल्या या अधिवेशनाला जळगाव, धुळे, नंदुरबार, संभाजीनगर या जिल्ह्यांमधील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, उद्योजक यांचे १०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
सनातनचे संत सदगुरु नंदकुमार जाधव यांच्या वंदनीय तसेच प्रज्ञा सेवा धाम नंदगावचे पंडित जितेंद्र शुक्लाजी, ह.भ.प. भरत महाराज, हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या कुमारी रागेश्री देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन झाले. या अधिवेशनात लव्ह जिहाद, भूमी जिहाद, गोरक्षण, धर्मांतरण, गड-दुर्ग संरक्षण तसेच धर्मद्रोह्यांकडून हिंदूंवर आणि हिंदु धर्माच्या विरोधात केला जाणारा अपप्रचार आदी आघातांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दुपारच्या सत्रात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात माझी भूमिका काय असणार ? या विषयावर गटचर्चा आयोजित करण्यात आली. शेवटच्या सत्रात विधिसंवाद आणि परिसंवाद घेण्यात आला. समारोपीय सत्रात सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी ‘आपत्कालीन सिद्धता’ या विषयावर मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन निखिल कदम यांनी केले.
हिंदूंनो, हिंदुराष्ट्राची पहाट पहाण्यासाठी साधना करून धर्माचरणी बनूया ! – सद्गुरू नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था
येणारा काळ हा महाभयंकर आपत्काळ आहे. म्हणजे संकटांचा काळ आहे, असे अनेक संत, भविष्यवेत्ते यांनी सांगितले आहे. फ्रान्सचा भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस, संत गगनगिरी महाराज, देव हालसिद्धनाथ यांनी सांगितलेली बरीच भविष्ये खरी ठरली आहेत. २०१८ च्या भविष्यवाणीत त्यांनी कोरोनासारख्या महामारीविषयी सांगितले होते. ते तंतोतंत खरे ठरले. तिसऱ्या महायुध्दाविषयी देखील त्यांनी सांगून ठेवले आहे. तिसरे महायुद्ध इतके महाभयंकर होणार असेल की, पहिली दोन महायुद्धे खेळण्यासारखी वाटतील. सध्याची जागतिक परिस्थिती पहाता तिसऱ्या महायुध्दाची ठिणगी केव्हाही पडू शकते. भूकंप, उष्णतेची लाट, महापूर, टोळधाड, वादळे यांसारख्या नैसर्गिक संकटांची मालिका चालू आहे. हा सर्व कालचक्राचा परिणाम आहे. कालमहिम्यानुसार वर्ष २०२५ ला हिंदु राष्ट्र येणारच आहे. हिंदुराष्ट्राची पहाट पहाण्यासाठी साधना करून धर्माचरणी बनूया.
श्री हनुमान चालीसेच्या माध्यमातून गावागावांतील हिंदूंना संघटित करू -कमलेश कटारिया
कालपर्यत शहरातील सिल्लोड येथील एका भागात हिंदु बहुसंख्यांक होते; मात्र आज तेथे हिंदूंची केवळ ४ घरे शेष राहिली आहेत. तेथील व्यावसायिक शहरात जागा विकत घेऊ शकत नाही किंवा विकू शकत नाही. एखादा हिंदु स्वतःचे घर बांधू शकत नाही. कारण नगर परिषदेत अनुमतीसाठी अनेक वेळा विनाकारण खेटे घालावे लागतात. पक्ष हितापेक्षा धर्मांधांनी धर्महीत जोपासून जिहादी प्रभाव निर्माण केला आहे. यासाठी आम्ही हिंदुराष्ट्र संकल्प अभियान गावागावात राबवत आहोत. श्री हनुमान चालीसा प्रति शनिवारी आयोजित करण्यात येत असून हे अभियान आता १०० हून अधिक गावात पोहचले आहे. याद्वारे ८ सहस्र हिंदू संघटित झाले आहेत. यापुढे हे अभियान व्यापक करून उर्वरित हिंदूंना संघटित करू, असे प्रतिपादन श्री. कटारिया यांनी केले.
आज स्रियांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरणी होणे आवश्यक- कुमारी रागेश्री देशपांडे
संपूर्ण भारतात हिंदु राष्ट्राचा उद्घोष चालू आहे. भारत हिंदु राष्ट्र होईल म्हणून शेजारील राष्ट्र चिंतेत आहेत. नेपाळमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी मोर्चे निघत आहेत. देहलीसारख्या ठिकाणी धर्मसंमेलन होत आहे. या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात समाजातील स्रियांचेही योगदान आवश्यक आहे. ज्याप्रमाणे जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे स्वप्न दाखवले आणि साकार करून घेतले, त्याप्रमाणे आज स्रियांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरणी होणे आवश्यक आहे.
हिंदूंनी सजग राहून दर्गामुक्त कान्हादेश निर्माण करणे आवश्यक – श्री. स्वामी ब्रह्मानंद राहुल चौधरी
मुघल काळापासूनच लँड जिहाद चालू असल्याचे लक्षात येते. देशभरात नाथ संप्रदायच्या ठिकठिकाणी समाध्या आहेत. या समाध्यांवरील भगवे वस्त्र काढून हिरवी चादर घातली गेली. अजमेर येथील दर्गा म्हणजे मच्छिन्द्र नाथांची तर गैबनशहा दर्गा म्हणजे गहिनीनाथांची समाधी आहे. यांनाच मजारीचे रूप दिले जाते. चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे पूर्वी केवळ मुसा काद्री दर्गा होता. आता तेथे मोठी मशीद करण्यात आली आहे. नाथांच्या समाधीवर केलेले हे अतिक्रमनच आहे, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे. यासाठी हिंदूंनी सजग राहून दर्गा मुक्त कान्हादेश करणे आवश्यक आहे.
अधिवेशनादरम्यान ‘पांडव वाडा जतन आणि संवर्धन’ तसेच ‘यावल दुर्ग जतन आणि संवर्धन’ या दोन कृती समितींची घोषणा करण्यात आली. शेवटी उपस्थित धर्मप्रेमीनी आपले मनोगत व्यक्त केले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे लढा देऊ, असा निर्धार या अधिवेशनात करण्यात आला. अधिवेशनाची सांगता संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने करण्यात आली.








