नंदूरबार l प्रतिनिधी
मुंबई सेंट्रल -दोंडाईचा एक्सप्रेस(०९०५१/५२) या गाडीच्या अंतरात वाढ केली असून ती आता भुसावळ पर्यंत धावणार आहे.यामूळे खान्देशवासियांनी आनंद व्यक्त केला आहे.
खान्देशातील प्रवाशांच्या समस्या लक्षात घेता भाजपा नेते तसेच तमाम खान्देशातील जनता यांच्या मागणीला प्राधान्य देत मुंबई सेंट्रल दोंडाईचा(०९०५१/५२) ही गाडी पाळधी किंवा जळगाव पर्यंत करण्यात यावी यासाठी निवेदन दिले होते.पश्चिम खान्देशच्या प्रवाशांसाठी थेट मुंबई सेंट्रल जाण्यासाठी नविन हंगामी प्रवाशी रेल्वे दि.९ जानेवारी पासुन ३१ मार्च पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत असुन सदर गाडी रविवार ,मंगळवार व शुक्रवार रोजी रात्री ११.५५ मिनीटांनी मुंबई सेंट्रल येथुन सुटेल प्रवासादरम्यान बोरीवली, भोईसर, वापी ,बलसाड ,नवसारी ,चलथान ,बेस्तान , बारडोली, व्यारा, नवापुर ,नंदुरबार , दोंडाईचा या ठिकाणी थांबुन अमळनेर १०.४७ मि.धरणगांव ११.१० मि.पाळधी ११.५५ मि.जळगाव व दुपारी १२ वा.भुसावळ येथे पोहोचेल.
सदर गाडी भुसावळ येथुन सोमवार,बुधवार व शनीवारी सुटणार आहे. विशेषत: सदर गाडीला प्रचंड मागणी असलेल्या बोईसर वापी येथे थांबा देण्यात आलेला आहे . यासंदर्भात खा.डॉ.हिना गावीत,खासदार उन्मेश पाटील, पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित, आ.जयकुमार रावल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व दर्शना जर्दोश ,रेल्वे बोर्ड यांच्याशी संपर्क व पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई सेंट्रल दोंडाईचा एक्सप्रेस भुसावळ पर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले आहे.
दरम्यान मुंबई सेंट्रल -दोंडाईचा एक्सप्रेस ही 23 डिसेंबर 2022 पासून सुरू होणार होती मात्र विविध मागण्या करण्यात आल्याने ती सुरू झाली न्हवती.मात्र आता 9 जानेवारी पासून मुंबई सेंट्रल -दोंडाईचा एक्सप्रेस आता भुसावळ पर्यंत धावणार आहे.








