नंदुरबार l प्रतिनिधी
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील कवली गावाजवळ वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील सोजरबार येथील बावा दित्या नाईक हे दुचाकीने (क्र.एम.एच. ३९ एए ८१४३) सोजरबारहून मणदेवी (गुजरात) राज्याकडे जात होते. यावेळी एका वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून कवली गावाजवळ दुचाकीला धडक दिल्याने बावा नाईक यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले.
याबाबत दित्या तुल्या नाईक यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम ३०४(अ), २७९, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रितेश राऊत करीत आहेत.








