नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील २०० ग्रामपंचायतींसाठी ७७.६८ टक्के शांततेत मतदान झाले. दरम्यान उद्या दि.१७ ऑक्टोंबर रोजी २०० ग्रामपंचायतींच्या मतमोजणी होणार आहे.

राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ४५, अक्राणी तालुका २५, तळोदा तालुका ५५ व नवापूर तालुक्यातील ८१ अशा एकूण २०६ ग्रामपंचायती सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि.१६ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार होते. मात्र अर्ज माघारीनंतर नवापूर तालुक्यातील जामतलाव, बिलबारा, तिळासर तर तळोदा तालुक्यातील सोमावल बु., धानोरा, अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहिर अशा ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे काल दि.१६ ऑक्टोंबर रोजी २०० ग्रामपंचायतींसाठी शांतेत मतदान पार पडले.

२०० ग्रामंपयातयींसाठी अक्कलकुवा तालुक्यात १५५ मतदान केंद्र, अक्राणी तालुक्यात ८३, तळोदा तालुक्यात १६२, नवापूर तालुक्यात २५४ असे एकूण ६५४ मतदान केंद्र होते. या २०० ग्रामपंयातीसाठी ३ लाख ३० हजार ५२१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. २०० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ४ हजार १६७ कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सकाळी ७.३० वाजेपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरूवात झाली.
यावेळी मतदानामध्ये उत्साह दिसून आला. सायंकाळीच्या वेळेस मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाली. अक्कलकुवा तालुक्यात ८०.४८, अक्राणी तालुक्यात ७७.९१, तळोदा तालुक्यात ८०.९६, नवापूर तालुक्यात ७३.७० असे एकूण १ लाख २९ हजार ५६५ स्त्री मतदार तर १ लाख २७ हजार १८३ पुरूष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील ४ तालुक्यातील २०० ग्रामपंचायतींसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान एकूण ७७.६८ टक्के मतदान झाले.








