नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील विखरण गावात एकाच रात्रीतून चोरट्यांनी दोन घरे फोडून १ लाख ३५ हजार रुपये रोख व साडे ११ ग्रॅम वजनच्या सोन्याच्या ३ अंगठ्या आणि १० भार चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला आहे. चोरट्यांनी आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळविला असून शेतकऱ्यांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली आहे.
चोरीची माहिती कळताच नंदुरबार तालुका पोलिसांनी घटनास्थळी येऊन श्वान पथकासह पाहणी केली असून मात्र चोरट्यांचा माघ दूरपर्यंत दिसून आला नाही. खरिप हंगाम जवळ आला असून शेतीसाठी बी-बियाणे घेण्याकरीता जपून ठेवलेले पैसेच चोरट्यांनी चोरून नेले आहे यामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्रीच्या सुमारास विखरण गावात अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडून मुद्देमाल लंपास केला आहे. यात वृद्ध शेतकरी आत्माराम धाकु पाटील हे आपल्या परिवारासह घराच्या छतावर झोपले असताना चोरट्यांनी याची संधी साधत घराच्या पुढील दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला.
यात लोखंडी पेटीत ठेवलेले १ लाख ३० हजार रुपयांची रोकड व एक ५ ग्रॅमची अंगठी , ६ ग्रॅम, एक अर्धा ग्रॅम अशा तीन सोन्याच्या अंगठ्या आणि १० भार चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला आहे.तसेच चोरटे एवढ्यावरच न थांबता दुसरे घर टार्गेट करून विखरण येथील शेतकरी चंद्रभान विनायक पाटील यांच्याही घराच्या कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत कपाटात ठेवलेली पाच हजारांची रोकड व चांदी चोरून नेली.
गावात दोन ठिकाणी चोरी झाल्याची माहिती सकाळच्या सुमारास उघडकीस आली असता गावकर्यांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली आहे.चोरी झाल्याची माहिती नंदुरबार तालुका पोलिसांना कळविण्यात आले असता पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे .
याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध वरील दोन्ही शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार पोलीस पाटील दीपमाला पाटील व पोलिस पथक उपस्थित होते. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.