नंदुरबार l प्रतिनिधी
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2021- 22 मध्ये सर्वोत्कृष्ट कल्पनातंर्गत शासकीय संस्था गटात तहसिल कार्यालय, तळोदा यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांना 50 हजार रुपये, सन्माचिन्ह आणि प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे. तळोदा तहसिल कार्यालयात त्यांनी उपलब्ध जागेचा पर्याप्त व सुनियोजितपणे वापर करुन तहसिल कार्यालयात वाहनतळ तयार करुन पार्किंगसाठी शिस्त लावली. तर याच गटात तहसील कार्यालय, नवापूर, जि. नंदुरबारने अभिलेख कक्षाचे नूतनीकरणाचा उपक्रम राबवीत 30 हजार रुपयांचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. याबद्दल जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी तळोदा आणि नवापूर तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक केले.
प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णय क्षमता आणण्यासाठी तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा सन 2021-22 पासून राबविण्यात येते. या अभियानांतर्गत सहभाग घेवून सर्वोत्तम कामगिरी करणारी कार्यालये, अधिकारी व सर्वोत्कृष्ट कल्पना, उपक्रम सूचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिके देवून गौरविण्यात येते. ही स्पर्धा राज्यस्तरावर चार गटात घेण्यात आली होती. तसेच तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर हे अभियान व स्पर्धा राबविण्यात आली. स्पर्धेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रधानमंत्री पारितोषिक योजनेच्या धर्तीवर ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यात आले होते.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2021- 22 मध्ये सर्वोकृष्ट कल्पनाअंतर्गत शासकीय गटात तळोदा व नवापूर तहसिल कार्यालयाने केलेले काम उत्कृष्ठ असून त्यांनी बजावलेल्या या कामगिरीमुळे जिल्हृयातील इतर विभागातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना यातून निश्चित प्रेरणा मिळेल. पुढील वर्षी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानात अधिकाधिक पुरस्कार जिल्ह्यास मिळतील असा मला विश्वास आहे.
श्रीमती. मनीषा खत्री,
जिल्हाधिकारी, नंदुरबार.









