नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यापूर्वीच गांधीधाम पूरी एक्स्प्रेसच्या पॅन्ट्री कारला आग लागल्याने यात पॅन्ट्री कोच जळून खाक झाला. याप्रकरणी चौकशीसाठी रेल्वे प्रबंधकांसह सात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नंदुरबारला दाखल होत पॅन्ट्री कोचची पाहणी केली. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली असून आठवडाभरात अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काय अहवाल प्राप्त होतो याकडे लक्ष लागून आहे.दोन दिवसानंतरही आगीचे कारण कळू शकले नाही.
नंदुरबार रेल्वे स्थानकानजीक सुरत येथून सकाळी निघालेल्या गांधीधाम पूरी एक्स्प्रेसमधील पॅन्ट्री कारला दि.२९ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. सुमारे दोन तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली होती. मात्र तोपर्यंत पॅन्ट्री कारच्या आतमधील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने कोचच्या आतमध्ये कोळसा झाला होता. सदरच्या घटनेने सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी प्रवाशांचे जिवित मात्र धोक्यात आले होते. यात रेल्वेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे दि.२९ रोजी सायंकाळी रेल्वे प्रबंधकांसह सात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नंदुरबार येथे चौकशीसाठी दाखल झाले होते. सदर पथकाने रात्री 8 वाजेपर्यंत रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी केली. काल दिवसभरात कोणताही अहवाल प्राप्त झाला नसल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, येत्या आठवडाभरात याबाबतचा अहवाल प्राप्त होणार असून पॅन्ट्री कोचला आग नेमकी कशामुळे लागली? हे समजणार असून दोषी आढळून येणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. यामुळे आता सदरच्या अहवालाकडे लक्ष लागून आहे.