नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरु झाल्या असल्या तरी शाळांमध्ये इ.१लीतील विद्यार्थ्यांची समाधानकारक संख्या नसल्याने येत्या कालावधीत शाळा बंद पडतील असे सांगत यावेळी जि.प. पदाधिकाऱ्यांकडून शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांनी
समन्वय साधून काम करा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.आदिवासी समाजाच्या मुलांच्या शिक्षणापासून वंचित ठेवत अधिकारी डूबवण्याचे काम करीत आहेत: संतप्त जि. प.सदस्यांचा आरोप
नंदुरबार जि.प.च्या स्थायी समिती सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात जि.प.ची स्थायी सभा संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, सभापती रतन पाडवी, निर्मला राऊत, गणेश पराडके, अजित नाईक, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
स्थायी सभेत विविध विषय समितींचा आढावा घेत असतांना कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरु झाल्या असल्या तरी शाळांमध्ये इ.१लीतील विद्यार्थ्यांची समाधानकारक संख्या नसल्याने येत्या कालावधीत शाळा बंद पडतील असे जि.प.सदस्य देवमन पवार यांनी सांगितले. काळंबा येथील शाळेत अवघे ६ विद्यार्थी असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी जि.प. पदाधिकाऱ्यांकडून शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचा कार्यभार काढून घेण्यासाठी प्रोसिडींगवर विषय घेण्याचे सभापती रतन पाडवी यांनी सूचित केले. यावेळी जि.प.सदस्य भरत गावित यांनीही प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.
जि.प.मध्ये विविध विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने कामे वेळेवर होत नाहीत. फक्त ढकलाढकली केली जाते. प्रत्येकवेळी सभेत पदाधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रश्नांची विचारणा झाल्यावर माहिती घेतो, सांगतो, करतो अशी उत्तरे अधिकाऱ्यांकडून दिली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र याबाबत कोणतेही गांभीर्य न पाळता काम केली जात नाहीत. यावर जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी व उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांनी सूचना देत प्रत्येक अधिकाऱ्याकडे आपापल्या विभागाबाबत माहिती असणे गरजेचे आहे. जि.प.मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज आहे. पाहीजे त्या प्रमाणात प्रभावी कामे होत नसल्याने जि.प.चे नाव खराब होत आहे. सन २०१६-१७ पासूनचे काही कामे पेंडींग आहेत तर गतिमानता येणार कशी? असा सवाल ॲड.राम रघुवंशी यांनी उपस्थित केला. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाशी समन्वय साधून कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जि.प.च्या विविध विभागात एकच फाईल त्रृटी पूर्ण झाल्यावर देखील अनेकदा फिरत असल्याने याबाबत शंका उपस्थित होते. पंचायत राज समितीच्या दौऱ्याप्रसंगी तसेच लाच प्रकरणी झालेल्या कारवाईत जि.प.ची इभ्रत वेशीवर टांगली गेली होती. मात्र किमान आतातरी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून जि.प.ची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करा, अशी अपेक्षा जि.प.पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. कामांमध्ये दिरंगाई झाल्यास खपवून घेतले जाणार नाही, अशा सूचना अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी दिल्या. दरम्यान,
लसीकरणावर भर देण्यात आला असून येत्या कालावधीत उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी महेंद्र चव्हाण यांनी सांगितले. खांडसरी परिसरात आढावा घेत असतांना तेथील मालकांशी बोलून ५७ तर तळोदा येथे एका वीट भट्टीजवळ १२ जणांचे लसीकरण करुन घेतले. गावपाड्यात शिरुन ठिकठिकाणी लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच स्थलांतरीत झालेल्या मजूरांच्या लसीकरणाबाबत देखील प्रयत्नशील असल्याचे डॉ.महेंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
जलव्यवस्थापन समितीचा आढावा सादर करीत असतांना तिनसमाळ येथे पाणी पोहचल्याचा उल्लेख संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्यावर सभापती रतन पाडवी यांनी प्रत्यक्ष जावून पाहणी करा, अंदाजित बोलून खोटी माहिती सभागृहासमोर देवू नका, असे खडेबोल सुनावले. जि.प.सदस्य भरत गावित यांनी मेडीकलच्या फाईली लवकर क्लिअर होत नसल्याने अनेकांना फिरफिर करावी लागते. यामुळे असे न करता आपल्याच कर्मचाऱ्यांना वेठीस धरु नका, असे भरत गावित यांनी सांगितले. रोजगार हमी योजनेची जिल्ह्यात सुमारे १८०० कामे सुरु असून त्यावर साडेसहा हजार मजूरांना काम मिळाल्याची माहिती यावेळी संबंधित विभागाकडून देण्यात आली.








