नंदुरबार l प्रतिनिधी-
राणीपूर ता धडगाव येथे आयसीएआर-एनबीपीजीआर (ICAR-NBPGR), नवी दिल्ली यांच्या वतीने ‘ट्रायबल सब प्लॅन’ (TSP) योजनेअंतर्गत राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ (वनस्पती जनुकीय संसाधने) जागरूकता कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
हा उपक्रम शासकीय कृषी महाविद्यालय, नंदुरबार यांच्या सहकार्याने राबविण्यात आला.
कार्यक्रमाचा उद्देश व साधनसामग्री वाटप: वनस्पती जनुकीय संसाधनांच्या संवर्धनाबाबत शेतकरी वर्गात जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या अंतर्गत शेतकऱ्यांना मका, ज्वारी आणि भात यांसारख्या प्रमुख पिकांचे सुधारित बियाणे, तसेच कृषी महाविद्यालयाच्या रोपवाटिकेत तयार केलेली आंबा व लिंबू या फळपिकांची रोपे, जैविक कीटकनाशके आणि बुरशीनाशकांचे वाटप करण्यात आले. याशिवाय, शेतीची कामे अधिक सुलभ व्हावीत, या हेतूने शेतकऱ्यांना लहान शेती अवजारांचेही वितरण करण्यात आले.
शाश्वत व सेंद्रिय शेतीचे महत्त्व: प्रशिक्षण कार्यक्रमात केवळ पिकांच्या सुधारित वाणांवरच नव्हे, तर ‘शाश्वत व सेंद्रिय शेती’ या विषयावर विशेष भर देण्यात आला. रसायनांचा अतिवापर टाळून जमिनीचा पोत सुधारणे, नैसर्गिक खतांचा वापर आणि जैविक कीड नियंत्रण याद्वारे शेती कशी फायदेशीर करता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शाश्वत शेती ही काळाची गरज असून, त्यातूनच दीर्घकालीन उत्पादकता आणि पर्यावरण रक्षण शक्य असल्याचे प्रतिपादन तज्ज्ञांनी केले.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन: प्रशिक्षण कार्यक्रमात शासकीय कृषी महाविद्यालय, नंदुरबार येथील सहयोगी प्राध्यापक, उद्यानविद्या डॉ. दीपककुमार अहिरे आणि सहाय्यक प्राध्यापक, कृषी विस्तार डॉ. दिनेश सूर्यवंशी यांनी संसाधन व्यक्ती (Resource Person) म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी कृषी-उद्यान पिके, रोपवाटिका व्यवस्थापन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाविषयी मोलाची माहिती दिली.
शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद: या कार्यक्रमासाठी राणीपूर परिसरातील आदिवासी महिला व पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने पीउपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे नियोजन आयसीएआर-एनबीपीजीआर, नवी दिल्ली येथील टीएसपी कार्यक्रम समन्वयक आणि वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. पंकज कुमार कन्नौजिया यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लक्ष्मीकांत भामरे (कृषी सहाय्यक, उद्यानविद्या) आणि शासकीय कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.







