जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव
नंदुरबार l प्रतिनिधी-
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे दिला जाणारा सन २०२६ चा ‘आदर्श ग्राम महसूल अधिकारी’ पुरस्कार नंदुरबार येथील जयेश सुभाषसिंग राऊळ यांना जाहीर झाला आहे. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडून यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार, दरवर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या तलाठ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. २२ एप्रिल २०२६ रोजी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्यात आली. शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार सजा येथे कार्यरत असलेले तलाठी जयेश राऊळ यांची या गौरवपूर्ण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) रोजी आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात श्री. राऊळ यांना हा पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात येणार आहे. पाच हजार रुपये, मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाचे सदस्य सचिव तथा अपर आयुक्त जितेंद्र वाघ यांनी या निवडीबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. या आधी श्री.राऊळ यांना जिल्हास्तरीय, तालुका स्तरावर अनेक पुरस्कारंानी गौरवण्यात आले आहे. श्री. राऊळ यांच्या या यशामुळे महसूल विभागात व नंदुरबार जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे.







