नंदुरबार l प्रतिनिधी
प्रत्येक मानव भौतिक सुखांमागे दाखवत आहे. मात्र जीवनातील ताण- तणावा पासून मुक्ततेसाठी ओम शांती परिवार महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. ओम शांती परिवाराच्या अध्यात्माकडे वळून जीवनात शांती आणि आनंद सुख प्राप्तीसाठी पाठशालांची निर्मिती होत आहे. परंतु एवढ्यावर समाधानी न होता शहरात एक भव्य दिव्य जिल्ह्याचे ओम शांती भवन निर्माण करण्याचा संकल्प करूया प्रतिपादन शहादा प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राच्या संचालिका राजयोगिनी विद्या दीदी यांनी केले.
नंदुरबार शहरातील जुनी भुई गल्ली परिसरात पंचवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सच्ची गीता पाठशाला च्या नवीन इमारतीचे उद्घाटन रविवारी मान्यवरांच्या हस्ते झाले. ज्ञान कमल कुंज पाठशाला या नावाने सुरू करण्यात आलेली गीता पाठशालेला यावर्षी 25 वर्षे पूर्ण झाले.
हे औचित्य साधून जुन्या जागेवर नव्याने बांधकाम केलेल्या पाठशाळेचा उद्घाटन सोहळा झाला. सर्वप्रथम रविवारी सकाळी जुन्या भोई गल्लीतील गीता पाठशाला चे उद्घाटन आणि ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तैलिक मंगल कार्यालयात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्व विद्यालयाच्या नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे दीप प्रज्वलन व अध्यात्मिक मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शालेय विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत धार्मिक गीतांवर नृत्य सादर केले. टाळ्यांच्या गजरात साधकांतर्फे प्रतिसाद मिळाला. नंदुरबार नगरपालिकेचे निवृत्त आरोग्य अधिकारी स्व. ज्ञानदेव राजपूत आणि श्रीमती कमल राजपूत यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी गीता पाठशाले साठी जागा दान देऊन वास्तू उभारली. याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवाराच्या दिवंगत संचालिका बीके विजया दीदी, बीके शकुंतला माता, तसेच बीके तुकाराम भाई, बिके विठ्ठल भाई, बिके हिराबाई, बीके आवडामाता यांच्या स्मृती जागविण्यात आल्या.
याप्रसंगी साक्री येथील केंद्राच्या संचालिका राजयोगिनी बीके शीला दीदी, निझर येथील बीके कमल दीदी, अहमदाबाद येथील केंद्राचे संचालक विवेकभाई, सिने अभिनेता रणजीत राजपूत यांनी मनोगत व्यक्त केले. नंदुरबार केंद्राच्या संचालिका बीके योगिता दीदी यांनी प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन बी के आरती दीदी यांनी केले.तर बीके वर्षा दीदी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास नंदुरबार नगर पालिकेच्या माजी नगरसेविका भारती राजपूत, उद्योजक अशोक राजपूत, विलास राजपूत, तसेच राजपूत समाजाचे जिल्हाध्यक्ष मोहिनीराज राजपूत, प्रजापिता ब्रह्मकुमारी मीडिया विंगचे जिल्हा समन्वयक महादू हिरणवाळे, यांच्यासह साधक बंधू भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.