नंदूरबार l प्रतिनिधी
खरीप हंगाम जवळ आला असून शेतकरी बियाणे खरेदी करत आहेत, मात्र बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्वक वाणाची निवड कशी करावी याबाबत विभागीय कृषी सहसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी नंदुरबार यांनी खालील प्रमाणे सूचना दिल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.
*कपाशीचा दाणा निवडताना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार व वाणाचे गुणधर्म यांचा विचार करावा.
* सर्व प्रकारच्या हवामानास व जमिनीस अनुकूल वाण असावे.
* आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा.
* वाऱ्यामुळे न पडणारे वाण असावे.
* रसशोषण करणाऱ्या किडी व रोगांना सहनशील / प्रतिकारक्षम वाण असावा.
* शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते. त्यामुळे उशिरा लागणाऱ्या बोंडांचा सुद्धा आकार मोठा राहतो व बोंडे फुटण्याचे प्रमाण वाढते.
* बागायती लागवडीसाठी माध्यम ते उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे.
* बोंडांचा आकार बागायती लागवडीसाठी मोठा व कोरडवाहू लागवडीसाठी मध्यम असावा.
* पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा. बोंडे चांगली फुटणारा व धाग्याची प्रत चांगली असणारा वाण निवडावा, त्यामुळे कपाशीला चांगला बाजारभाव मिळू शकेल.
* वरील गुणधर्माप्रमाणे आपला मागील हंगामातील अनुभव तसेच आपण स्वतः इतर शेतकऱ्यांच्या शेतावरील पीक पाहून कपाशीच्या वाणाची निवड करावी.
अधिक उत्पादन देणारे वाण बाजारात उपलब्ध असून त्यांचे त्या-त्या वाणाच्या गुणधर्मानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास निश्चितपणे चांगले उत्पादन मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.
शेतकऱ्यांनी कपाशीचा योग्य वाण निवडून खरेदी करून ठेवावे सध्या तापमान जास्त आहे 36 ते 38 सेल्सिअस तापमाना त शेतकऱ्यांनी कपाशी लागवड करावी .
स्वप्निल शेळके.
तालुका कृषी अधिकारी ,नंदुरबार








