कपाशी व कांदा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होवून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पिकांचे त्वरीत पंचनामा करण्यात येवून त्यांना बांधावरच पंचनाम्याची प्रत देण्यात यावी, जेणेकरुन पिकविम्याचा शेतकर्यांना लाभ होईल, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांना देण्यात आले आहे.
प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात तसेच शहादा तालुक्यातील काही भागात व अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील सातपुड्याच्या पर्वत रांगेत शेतकर्यांनी खरीप पिके कपाशी, कांदा तसेच उडीद इत्यादी पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरली असून नंदुरबार व शहादा तालुक्यातील जवळ-जवळ ८५ टक्के कपाशी पिकावर लाल्या रोगाने थैमान घातले असून कपाशीचे पिक उद्धस्त होण्याच्या मार्गावर आहे. तसेच कांदा पिकाचीही मर रोगामुळे शेतकर्यांचे पिक उद्धस्त झाले असून शेतकरी हवालदिल झाला असून उशिरा आलेला पाऊस, दोन-तीन वेळा केलेली पेरणी, त्यातच आता पिकांवरील रोगराईचे थैमान मोठ्या प्रमाणात सुरु असून शेतकर्यांचे थोडेफार काही उत्पन्न येणार होते, तेही रोगराईमुळे उध्वस्त होत आहे. अशा परिस्थितीत संबंधित शेतकर्यांच्या पिकांची कृषि व महसूल खात्यामार्फत त्वरीत पंचनामे करुन संबंधित शेतकरी बांधवांना त्वरीत पिकविमा मिळण्यासाठी संबंधित पिका विमा कंपनी व कृषि खात्यातील अधिकार्यांना त्वरीत सुचना कराव्यात. कारण कृषि खात्यातील अधिकारी व पिका विमा कंपनीचे अधिकारी अत्यंत मुजाेर असून शेतकरी बांधवांच्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीत. आमच्या आपणास विनंती आहे की, पिकावर आलेल्या रोगांचे त्वरीत पंचनामे सुरु करुन प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकर्याला जागेवर पंचनामा झाल्याची प्रत देण्यात यावी. जेणेकरुन पिकविमा कंपनीला धारेवर धरता येईल. वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून आपण तात्काळ कारवाई कराल, अशी अपेक्षाही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेप्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील, नंदुरबार तालुकाध्यक्ष योगेश पाटील, तालुका उपाध्यक्ष अशोक पाटील, रविंद्र वळवी, सावळीराम करे, किरण पाटील, प्रताप पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.