नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार रेल्वे स्थानकावर आढावा घेण्यासाठी पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अशोक कुमार मिश्रा आले होते. यावेळी खा.डॉ.हीना गावित यांनी विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करुन स्थानिक समस्या निदर्शनात आणून दिल्या.दरम्यान पुण्यासाठी रेल्वे सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशिल असून परंतु पुणे रेल्वे स्थानकात जागाच नसल्याने नंदूरबार हून रेल्वे सुरू करता येत नसल्याचे पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक यांनी यावेळी सांगितले दरम्यान, नंदुरबार रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी चौथ्या प्लॅटफार्मची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी रेल्वे सल्लागार समिती सदस्यांकडून करण्यात आली असून याबाबत महाप्रबंधकांना निवेदन देण्यात आले.
पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अशोक कुमार मिश्रा नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर आले होते. यावेळी त्यांनी रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत खा.डॉ.हीना गावित, डीआरएन निरज वर्मा यांच्यासह रेल्वे सल्लागार समितीतील सदस्य जवाहरलाल जैन, सुभाष पानपाटील, प्रशांत चौधरी, दुर्गेश राठोड, मिलींद मोहिते उपस्थित होते. यावेळी महाप्रबंधकांनी नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या तिघी प्लॅटफार्म, पादचारी पूल आदी ठिकाणांची पाहणी केली.
दरम्यान, खा.डॉ.हीना गावित यांनी महाप्रबंधक अशोक कुमार मिश्रा यांना स्थानिक पातळीवरील प्रवाशांना येणाऱ्या समस्यांबाबत माहिती देऊन चर्चा केली. याप्रसंगी रेल्वे सल्लागार समितीच्यावतीने महाप्रबंधकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार शहराच्या मध्यातून लोहमार्ग गेला आहे. यामुळे शहराचे दोन भाग झाले आहेत. बऱ्याचदा रेल्वे प्रवाशांना बाहेर निघण्यासाठी केवळ एकच प्लॅटफार्म उपलब्ध आहे. यामुळे रेल्वे स्थानकाच्या उत्तर दिशेला सर्व सोयी सुविधांयुक्त नवीन चौथ्या क्रमांकाचा प्लॅटफार्म निर्माण करण्यात यावा,
नंदुरबार रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म ओलांडण्यासाठी सुरतच्या दिशेला नवीन पादचारी पुल बनविण्यात येत आहे. मात्र तो केवळ प्लॅटफार्म १, २ व तीन पुरताच मर्यादीत आहे. यामुळे सदरचा पादचारी पूल स्टेशनच्या दोन्ही बाजूला बनविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग, जेष्ठ नागरिक, आजारी प्रवाशांसाठी लिफ्टची सुविधा निर्माण करण्यात यावी. नंदुरबार रेल्वे स्थानक परिसरात अंडर बायपासची निर्मिती करण्यात आली आहे.
मात्र पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतो. यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरत-पुरी, एकतानगर -महामना एक्स्प्रेसला थांबा देण्यात यावा. पुण्यासाठी स्वतंत्र रेल्वे सुरु करण्यात यावी. नवजीवन एक्स्प्रेस पुन्हा जुन्या वेळेवर सुरु करण्यात यावी. नंदुरबार रेल्वे स्थानकावर तिकिट रिझर्व्हेशनसाठी दोन खिडक्या असून दोन्ही सुरु ठेवण्यात याव्यात. तसेच मनमाड-इंदौर रेल्वे मार्गादरम्यान नरडाण्याहून धुळ्यासाठी लोहमार्गाची निर्मिती करुन प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.









