नंदूरबार l प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याचा 75 व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम देशभर राबविण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे असे आदेश शासनामार्फत सर्व विभागांना देण्यात आले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग आणि जागरुकता सुनिश्चित करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आज दि. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, डॉ. बी.जो. शेखर पाटील यांचे हस्ते महावीर हायस्कुल, शहादा व डोंगरगांव शिवारातील माळरानावर 7 हजार 500 वृक्ष लागवड करुन वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचे शहादा शहरात आगमन होताच शहादा येथील बिरसा मुंडा चौक ते महावीर हायस्कुल या 3 कि.मी. रस्त्याच्या दुतर्फा शहादा शहरातील विविध शाळेच्या 1500 विद्याथ्र्यांनी 1500 वृक्षांची लागवड करुन तसेच हातात तिरंगा झेंडा घेवून भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी देशभक्तीपर वातावरण निर्माण केले तसेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, डॉ. बी.जी. शेखर पाटील यांचे आगळेवेगळ्या रितीने शहादा शहरात स्वागत केले.
महावीर हायस्कुल येथे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक,डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचे आगमन झाल्यावर भारतीय परंपरा व रितीरिवाजाप्रमाणे त्यांचे औक्षण करण्यात आले. तसेच भारतीय स्वातंत्र्याचा 75 व्या वर्षानिमित्त 75 मीटर लांबीचा भारताचा तिरंगा शाळेतील विदयार्थ्यांनी हातात घेवून शाळेच्या आवारात रॅली काढण्यात आली. त्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी भगवान
महावीर, भारत माता सरस्वती देवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच द्विप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचा सत्कार महावीर चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन रमेशचंद्र चोरडिया यांनी केला.
दि. 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणार असून भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होऊन त्याची शताब्दी महोत्सवाकडे यशस्वी वाटचाल सुरु होईल. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशासमोर अनेक आव्हाने होती. देशातील जनतेच्या साक्षीने देशातील शासकांनी ही आव्हाने लीलया पेलली. काळ बदलत गेला तशी देशासमोरील आव्हाने बदलत गेली.
आज देशात ज्या समस्या आहेत त्यातील सर्वात महत्वाची समस्या पर्यावरण संवर्धन ही आहे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षांचा कार्यक्रम राबवितांना तो कार्यक्रम त्याविशिष्ट दिवसापुरता मर्यादित न रहाता त्याचा समाजमनावर व्यापक परिणाम व्हावा. तसेच त्यातुन दुरगामी चांगले परिणाम दिसावे याकरीता नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे 75000 वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे संकल्पनेतून 75 हजार वृक्षारोपण करण्याचे लक्ष्य असून यातील पहिला टप्पा म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील 12 पोलीस ठाणे व पोलीस मुख्यालय तसेच शाळा / महाविद्यालयाच्या आवारात व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करत 25 हजार वृक्ष लागवड केलेली आहे. तसेच उर्वरीत 50 हजार वृक्ष लागवड 15 ऑगस्ट रोजी पर्यंत नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात येईल. त्याचाच एक भाग म्हणून आज सुमारे 7500 वृक्षलागवड करण्यात आली.
तसेच नंदुरबार जिल्ह्यात मागील काही दिवसात कोविडचा प्रभाव कमी झाल्यानंतर साजरे झालेले रमजान ईद, शिवजयंती, विविध महापुरुषांच्या जयंती, रामनवमी तसेच आगामी काळात साजरे होणारे मोहरम विश्व आदिवासी दिन तसेच गणेशोत्सव काळात डी.जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपारिक वाद्य वाजवावे असे आवाहन प्रशासनाने केले होते.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळांनी प्रशासनाच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद देत पारंपारिक वादये वाजवून नंदुरबार जिल्हा डी.जे. मुक्त व डॉल्बी मुक्त करण्याचा प्रयत्न नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने केला आहे असे आपल्या प्रास्ताविकपर भाषणात नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या 75000 वृक्ष लागवड कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी कौतुक केले.
वृक्ष लागवड करुन पर्यावरण संवर्धन केले तरच ती पृथ्वीला व पर्यावरणाला दिलेली खरी संजीवनी ठरेल असेही त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. पर्यावरण संरक्षण बरोबरच ध्वनी प्रदुषण रोखणे ही देखील मोठी समस्या सध्या संपूर्ण मानव जातीसमोर असल्याचे त्यांनी सांगीतले. त्यामुळे डॉल्बी मुक्त व डी. जे. मुक्त मिरवणूका काढून संपुर्ण महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हयाने एक चांगला आदर्श घालून दिला असल्याचे त्यांनी सांगितले. नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रातील ध्वनीप्रदुषण मुक्त मिरवणूक काढणारा पहिलाच जिल्हा असेल असेही मनोगत त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
डॉल्बी मुक्त व डी. जे. मुक्त मिरवणूका काढून सण उत्सव साजरा करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील 235 मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशंसापत्र देऊन त्यांचे विशेष कौतूक नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी शहादा श्रीकांत घुमरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार सचिन हिरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा संभाजी सावंत, पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा आत्माराम प्रधान, शहादा तहसिलदार मिलींद कुलकर्णी,
रमेशचंद्र चोरडिया, चेअरमन महावीर चॅरिटेबल ट्रस्ट, शहादा, ए. एम. पाटील, प्राचार्य महावीर इंग्लिश मिडीअम स्कुल, पारस देसरडा, सचिव महावीर चॅरिटेबल ट्रस्ट शहादा, शहादा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मोतीराम पाटील, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्यासह जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व इतर मान्यवर तसेच शहादा शहरातील विविध शाळांचे सुमारे 3 हजार विद्यार्थी / विद्यार्थीनी उपस्थित होते.