नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत केंद्र शासनातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे “एक स्टेशन एक उत्पादन” असा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर एक स्टेशन एक उत्पादन या उपक्रमास आज प्रारंभ झाला. जिल्ह्यातील नागरिकांनी नंदुरबार रेल्वे स्थानकावरील एक स्टेशन एक उत्पादन या स्टॉलला भेट देण्याचे आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.
या अभिनव उपक्रमांतर्गत दोंडाईचा येथील संतश्री आसाराम बापू गोरक्षा केंद्राचे शुद्ध, सात्विक ,उत्पादन उपलब्ध आहेत. येत्या सहा ऑगस्टपर्यंत सदर स्टॉल उपलब्ध असून भाविकांनी या स्टॉलला भेट देण्याचे आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे. गाईच्या शेणापासून निर्मित साबण, फिनाईल, धूप, अगरबत्ती तसेच गोमूत्र याशिवाय शुद्ध तूप ना नफा ना तोटा या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
पहिल्या टप्प्यात दोंडाईचा येथील आसाराम बापू आश्रम समिती व सेवा केंद्र मार्फत आयुष्य, शक्तीवर्धक आणि आरोग्यदायी, आयुर्वेदिक औषधे, गुणकारी उत्पादन उपलब्ध आहेत.नंदुरबार शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोणतेही स्वदेशी उत्पादन स्टॉल लावण्यास पात्र असून बचत गट किंवा वैयक्तिक उत्पादकांनी नंदुरबार रेल्वे विभागाच्या वाणिज्य अधीक्षकांना भेटण्याचे आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.