म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील बामखेडा त.त. येथे आगीपासून गव्हाचे पीक वाचवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा तालुक्यातील बामखेडा त.त.येथील मयत शेतकरी संजय एकनाथ चौधरी (वय 56 ) व त्यांचे मोठे बंधु रोहिदास एकनाथ चौधरी हे दोघे भाऊ त्यांच्या शेतात हजर असताना त्यांच्या शेतालगत असलेले देविदास उर्फ गणेश उखा पटेल यांचे शेत गट नं. 124 ज्यात उसाची लागवड केली आहे, सदर शेतीच्या वरून विद्युत वाहिनी (इलेक्ट्रिक लाईन) गेलेली असून त्याच्या शॉर्टसर्किटमुळे उसाला अचानक आग लागली. बाजूला संजय चौधरी व रोहिदास चौधरी यांचा गव्हाची लागवड असलेले शेत गट नं. 129 मधील संजय एकनाथ चौधरी हे गहू पिकाला आग लागू नये म्हणून उसात लागलेली आग विझविण्याचा प्रयत्नात होते, परंतु सदर आगीने रौद्र रूप धारण केल्याने उसाच्या शेतात ते अडकून पडले त्यामुळे त्यांच्या आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी गावातील पोलीस पाटील डॉ योगेश चौधरी , सरपंच मनोज चौधरी व सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीसांनी भेट देत घटनेची माहिती घेत पंचनामा केला. संजय चौधरी हे पीक संरक्षण सोसायटीचे माजी चेयरमन होते त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.