म्हसावद l प्रतिनिधी
संजय गांधी योजने अंतर्गत येणाऱ्या विविध पेन्शन योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या वयाचा दाखला हा केवळ शहादा तालुक्यातील म्हसावद येथेच उपलब्ध न करून देता तो दाखला तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपलब्ध करून द्यावा.जेणे करून जेष्ठ नागरिक,विधवा,अपंग आदी लाभार्थ्यांना परेशानी व आर्थिक भूदंड न होता त्यांचा वेळ व पैसा वाचेल.अशी मागणी काही सदस्यांनी नुकत्याच झालेल्या शहादा पंचायत समितीच्या मासिक मिटिंगमध्ये उचलून धरली.त्या अनुषंगाचा ठराव करण्यात येऊन सर्वानुमते सभेत मंजूर करण्यात आला.
सविस्तर माहिती अशी की,संजय गांधी योजने अंतर्गत ज्या जेष्ठ,विधवा,अपंग आदी लाभार्थ्यांना वयाचा दाखला आवश्यक असतो अशा लाभार्थ्यांना वयाचा दाखला मिळविण्यासाठी शासकीय स्तरावरून म्हसावद(ता.शहादा)येथील ग्रामीण रुग्णालयात सोय करण्यात आली आहे.त्यासाठी आठवड्यातून एक दिवस व एक वैद्यकीय अधिकारी निश्चित करण्यात आला आहे.परंतु बऱ्याचदा त्या दिवशी सुटीचा दिवस येऊन जातो किंव्हा संबंधित वैद्यकीय अधिकारी शासकीय वा खासगी अशा काही ना काही कारणास्तव रुग्णालयात उपस्थित राहत नाही.बिचाऱ्या लाभार्थ्यांना याबाबत कोणतीही पूर्व कल्पना मिळत नसल्याने तालुक्यातील कानाकोपऱ्यातून म्हसावद ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या लाभार्थ्यांना मात्र मोठ्या परेशानीला सामोरे जावे लागत आहे.हे लाभार्थी आधीच अशिक्षित,वयोवृद्ध,विधवा,अपंग असल्याने त्यांना इतरांचा सहारा घेऊन म्हसावद येथे यावे लागते आणि येथे येऊन जर संबंधित अधिकारीच उपस्थित नसल्यास त्यांना मोठा आर्थिक,मानसिक,शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.अशी एकंदरीत परिस्थिती बऱ्याच वर्षांपासून सूरू असल्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी हा वयाचा दाखला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध व्हावा अशी मागणी तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील लोकप्रतिनिधिंकडे केली.त्यानुसार नुकत्याच झालेल्या शहादा पंचायत समितीच्या मासिक सभेत पंचायत समिती सदस्यांनी हा विषय सभेपुढे उचलून धरला.विषयाचे गांभीर्य पहाता या विषयास सर्वानुमते मान्यता देऊन तात्काळ ठराव करण्यात आला. त्याबाबतचे निवेदन गट विकास अधिकारी डॉ.राघवेंद्र घोरपडे यांना देण्यात आले.यावेळी सभापती बायजाबाई भिल,उपसभापती वैशाली पाटील,पं.स.सदस्या रोहिणी पवार,भानुमती ईशी,चंदन पानपाटील,संगीता पाटील,निमा पटले,कमलबाई ठाकरे,रमणबाई पवार,ललिता शेवाळे,रंगीलीबाई पावरा, सरला ठाकरे,ललिता बाविस्कर,रत्नाबाई पवार,अरुणा भिल,सत्येन वळवी,गोपी पावरा,विजयसिंग पावरा,गणेश पाटील,किशोर पाटील,श्रीराम याईस,जयसिंग माळीच,प्रकाश पावरा,विरसिंग ठाकरे आदी उपस्थित होते.