नंदुरबार l प्रतिनिधी
मानवी अस्तित्व हे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे निसर्गातील भूमी , जल, वायु ,आकाश या पंचमहाभूतांचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी शासनाने माझी वसुंधरा अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून सर्वांनी आपला सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करावे व गावाला राज्यस्तरीय बक्षीस मिळवून द्यावेअसे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत निवड झालेल्या राजमोही मोठी ता. अक्कलकुवा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे बोलत होते . नंदुरबार जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियानांतर्गत एकूण पंधरा गावांचे निवड करण्यात आली आहे. अभियानात निवड झाल्यानंतर राजमोही ग्रामपंचायतअंतर्गत सुरू असलेले विविध उपक्रमांची पाहणी व गोविंद लसीकरणाबाबत सुरू असलेल्या हर घर दस्तक मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्याचे काम पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी राजमोही येथे भेट दिली यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, निसर्गाचे संतुलन व पंचमहाभूतांचे संरक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड करून यांचे जतन करणे आवश्यक आहे. जलसंवर्धनासाठी वनराई बंधारे शोष खड्डे यासारखे उपक्रम राबवावेत. ऊर्जा बचतीसाठी सौर दिवे ,एलईडी दिवे यांचा वापर वाढवावा. प्रदूषण रोखण्यासाठी बायोगॅस, सौर चूल यांचा वापर वाढवावा, प्लास्टिक बंदी करावी तसेच सांडपाणी व घनकचरा चे व्यवस्थापन करून गाव स्वच्छ व सुंदर करावे. यानंतर त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना पर्यावरण संरक्षणाविषयी शपथ दिली. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील गटविकास अधिकारी नंदकुमार सूर्यवंशी सहाय्यक गटविकास अधिकारी महेश पोतदार आदी उपस्थित होते ,यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फडोळ यांनी उपस्थितांना माझी वसुंधरा अभियानांतर्गत राबवावयाच्या व
विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच अभियानात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राज्यस्तरावर बक्षीस कसे घेता येईल याविषयी मार्गदर्शन केले तसेच अभियानाविषयी सर्व स्तरांपर्यंत जाणीव जागृती करण्यासाठी कोण कोणते उपक्रम राबवावेत याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी सरपंच जयमल पाडवी, पोलिस पाटील जगन पाडवी, रविकांत पाडवी, ग्रामसेवक मोहन वळवी, ग्राम पंचायत सदस्य आदीसह ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते
यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी कोरोना लसीकरणाबाबत जिल्ह्यात सुरू असलेल्या हर घर दस्तक मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत राजमोही व मेवास अंकुश .विहीर येथील लसीकरण केंद्राना भेटी देऊन तेथील लसीकरणाबाबत माहिती घेतली . गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणेबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करून लसीकरणाचे महत्व पटवून दिले. यावेळी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. पटले व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








