नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार, अक्कलकुवा, शहादा, नवापूर आगारातील एसटी प्रवासी वाहतूक सेवा एसटी सेवा कर्मचार्यांच्या आंदोलनामुळे पूर्णपणे बंद आहे. तर नंदुरबार आगारातून जिल्हा अंतर्गतसेवा सुरू आहे.


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचार्यांनी आपली प्रमुख मागणी एसटी महामंडळ हे महाराष्ट्र शासनात विलगीकरण करावे.यासोबतच एसटी कर्मचार्यांना ही महाराष्ट्र राज्य शासनाच्या कर्मचार्यांप्रमाणे वेतन अदा करण्यात यावे, एसटी कर्मचार्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या कर्मचार्यांप्रमाणे सेवाजेष्ठता निश्चित करून एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे.
त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नवापूर आगारातील एसटी सेवा कर्मचार्यांच्या आंदोलनामुळे पूर्णपणे बंद आहे. एकमेव नंदुरबार आगारातून जिल्हा अंतर्गत एसटी प्रवासी वाहतूक सेवा सुरू आहे. एसटी कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मध्यरात्री पासून बेमुदत संपाला सुरुवात केली आहे, पहाटेपासून शहादा अक्कलकुवा नवापूर या आगारा मधून एकही बस बाहेरगावी रवाना झालेले नाही. नवापूर, शहादा, अक्कलकुवा बस आगारात सुरू असलेल्या संपामुळे प्रवाशांना महा त्रास सहन करावा लागतोय. जोपर्यंत एसटी कर्मचार्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचे आंदोलनाला बसलेल्या कर्मचार्यांनी सांगितले आहे.
काम बंद आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, शहादा, अक्कलकुवा आगारात मध्यरात्री पासून कर्मचार्यांनी संप पुकारल्याने प्रवाशी वाहतूक सेवा बंद होती. मात्र नंदुरबार आगारातून सकाळी अंशतः एस्टी प्रवासी वाहतूक सुरू होती. दुपारी कर्मचार्यांनी अचानक संप पुकारल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. सकाळी गावावरून शहरात आलेल्या नागरिकांना पुन्हा घरी जायला असुविधा निर्माण झाली आहे.
तर सरकारी बस बंद असल्याने खाजगी प्रवाशी वाहतुकदारांकडून अवाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशाची लूट सुरू आहे. त्यामुळे शासनाने एसटी कर्मचार्यांच्या समस्या लवकर सोडवून गैरसोय टाळावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
शहादा येथे आंदोलन
महाराष्ट्रभरातून गेल्या चार महिन्यात ३५ पेक्षा अधिक एसटी कर्मचार्यांनी आत्महत्या केली आहे, याचे कारण कमी वेतन तेही वेळेत मिळत नाही. तुटपुंज्या पगारावर परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेतून एसटी कर्मचार्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. महाराष्ट्र शासनाने एसटी कर्मचार्यांना राज्य शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेतन अदा करावे, शासकीय कर्मचार्यांमध्ये विलीनीकरण करून न्याय द्यावा या प्रमुख मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आगारातही एसटी कर्मचार्यांनी एकजुटीने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. अक्कलकुवा, आगारातील कर्मचार्यांचेही आंदोलन सुरु असून नंदुरबार आगारात अंशता सुरू असलेली बससेवा दुपारनंतर बंद होण्याची चिन्हे असून आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याची माहिती कर्मचार्यांनी दिली आहे. राज्य शासनाने आतातरी आमच्या मागण्या मान्य कराव्या. एसटी कर्मचार्यांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी शहादा आगारातील आंदोलनाला बसलेल्या कर्मचार्यांनी केली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.









