देशाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात पोलादी पुरुष (आयर्न मॅन) म्हणून ओळख असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा ३१ ऑक्टोबर हा जयंती दिन साऱ्या देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील करमसद येथे झाला अन् ब्रिटिश राजवटीला तगडं आव्हान देणारा जणू पोलादी पुरुष च उदयास आला.वल्लभभाई यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई तर,आईचे लाडबाबेन. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचा विवाह झवेरबा यांच्याशी झाला.त्यानंतर त्यांनी गोध्रा येथे आपल्या गृहस्थ जीवनास सुरुवात केली.त्यांना मनिबेन अन् डाह्याभाई ही दोन अपत्ये होती.वल्लभभाई यांना सोमाभाई, नरसिंहभाई,विठ्ठलभाई, काशीभाई हे चार भाऊ आणि दहिबा ही बहीण असा परिवार होता.
भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्या नेत्यांनी मोठं योगदान दिलं,त्यात वल्लभभाई पटेल यांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतलं जात़ं.राष्ट्रपिता महात्मा गांधींनी अहिंसा व सत्याग्रह या तत्वांवर देशाला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जो लढा उभारला,त्यात वल्लभभाई हे अग्रस्थानी राहिले.या लढ्या दरम्यान त्यांना महात्मा गांधी यांच्यासमवेत अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला.दरम्यान इंग्लंडमध्ये बॅरिस्टर पदवी संपादन केल्यावर त्यांनी काही काळ खेडा,बोरसद अन् बारडोली येथे वकिली केली.परंतु इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत देशाला मुक्त करण्यासाठी त्यांनी वकिली सोडून गांधीजींच्या नेतृत्वाखालील भारतीय स्वातंत्र्य लढ्यात थेट उडी घेतली.गुजरातमधील शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनी इंग्रजांच्या जुलूमशाहीविरुद्ध रणशिंग फुंकले.त्यानंतर त्यांची गणना प्रमुख नेत्यांमध्ये होऊ लागली.त्यांनी कराची येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पद भूषविले. त्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर मोठा दबदबा होता. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी दिलेलं बहुमोल योगदान भारतीयांच्या चिरकाल स्मरणात राहील,हे निश्चित.
सन १९२८ मध्ये शेतकऱ्यांवर लादलेल्या ब्रिटिश सरकारच्या जुलुमी कर आकारणीच्या विरोधात सरदार पटेल यांनी तीव्र आंदोलन छेडलं.महत्वाचे म्हणजे मिठाच्या सत्याग्रहात इंग्रज पोलिसांकडून पकडले जाणारे ते एक प्रमुख नेते होते.याबद्दल त्यांना १९३२ मध्ये १६ महिने येरवडा तुरुंगात,तर एक वर्ष नाशिक कारागृहात शिक्षा भोगावी लागली.तथापि, वल्लभभाई यांनी जेलमधून बाहेर येताच विदेशी मालाची जाहीर होळी करून स्वदेशी मालाचा वापर करण्यास भारतीयांना आवाहन केलं.वल्लभभाईंनी सर्वधर्मीय लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवून,ब्रिटिश राजवट उलथून टाकण्यासाठी त्यांना संघटित केलं.वल्लभभाई हे विदेशी कपडे त्यागून खादीचे कपडे वापरण्यावर शेवट पर्यंत आग्रही राहिले.१९४२ च्या चले जाव (क्विट इंडिया मूव्हमेंट) आंदोलनातही ते आघाडीवर होते.महात्मा गांधी,वल्लभभाई पटेल,पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री,इंदिरा गांधी,सुभाषचंद्र बोस,वीर भगतसिंग,वीर सावरकर, बाल क्रांतिकारक शिरीष कुमार मेहता आदी असंख्य देशभक्तांच्या बलिदानातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं अन् ब्रिटिश राजवट संपुष्टात आली.हेच खरे क्रांतिकारकांच्या बलिदानाचे फलित होय.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सरदार वल्लभभाई पटेल यांना देशाचे पहिले उप पंतप्रधान अन् गृहमंत्री होण्याचा मान मिळाला.गृहमंत्री असताना त्यांनी पाकिस्तानमधून निर्वासित म्हणून आलेल्या नागरिकांना दिल्ली व पंजाबमध्ये जागा देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.इतकेच नव्हे तर,फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सरदार पटेल यांनी मोलाचं योगदान दिलं. देश स्वतंत्र झाल्यानंतर हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.राजकीय मुसद्देगिरी अन् सैन्यबळाच्या जोरावर त्यांनी या संस्थानांचे विलिनीकरण करण्याचा धाडसी निर्णय घेतला.त्यामुळे जनमानसात त्यांची प्रतिमा अधिकच उजळून निघाली.या पार्श्वभूमीवरच भारतीयांनी त्यांना पोलादी पुरुष ही उपाधी दिली.सरदार पटेल हे मुक्त व्यापार आणि खाजगी मालकी हक्काचे समर्थक होते.देशाच्या फाळणीतही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.भारताची एकता,अखंडता व सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी आपलं सारं आयुष्य पणाला लावलं.यासाठी सरदार पटेल यांना त्रिवार मानाचा मुजरा!
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भरीव योगदानाबद्दल कृतज्ञता बाळगून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्यांच्या नावाने गुजरात आणि महाराष्ट्रात अनेक शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आल्या.याशिवाय सरदार सरोवर ड्याम,सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक,सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल मेमोरियल,सरदार पटेल युनिव्हर्सिटी,सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम,सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट,सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आदी तत्सम संस्था त्यांच्या नावाने उभारून त्यांना समर्पित करण्यात आल्या.हीच आहे खरी फलश्रुती सरदार पटेल यांच्या देशाप्रती असलेल्या समर्पणवृत्तीची! हॅट्स ऑफ टू आयर्न मॅन
उल्लेखनीय बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नर्मदा नदीच्या केवडिया कॉलनीच्या निसर्गरम्य परिसरात सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वाधिक उंच असा भव्यदिव्य statue of Unity of India हा पुतळा उभारण्यात आला आहे. भारतीयांसाठी ही प्रेक्षणीय वास्तू खऱ्या अर्थाने सर्वांसाठी पर्यटनाचं आकर्षक स्थळ बनल्याने लाखो विदेशी व परदेशी पर्यटक त्यास भेटी देऊन,पर्यटनाची मजा लुटत असतात.या पुतळ्याची उंची १८२ मीटर असून,त्यावर अंदाजे ३,००० कोटी खर्च झाल्याचे सांगण्यात येते.हा पुतळा पूर्णत: कास्याने बनविला असून,त्यासाठी सुमारे १८५० टन कास्य वापरलं गेलं आहे.हा पुतळा पद्मश्री राम सुतार या ज्येष्ठ मराठी शिल्पकाराने साकारला असून,त्यासाठी सुमारे २५०० कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.सदर पुतळ्याचे अनावरण ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. पोलादी पुरुष सरदार पटेल यांना त्रिवार मानाचा मुजरा!
याशिवाय केंद्र सरकारने ३१ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.खरं
तर,हीच सरदार पटेल यांना खरी आदरांजली ठरेल. वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जीवनात सरदार,पोलादी पुरुष यासह युनिफायर ऑफ इंडिया,बिस्मार्क ऑफ इंडिया,फौऊंडर ऑफ रिपब्लिक ऑफ इंडिया, प्याट्रोन सेंट ऑफ इंडियाज सिव्हिल सर्वंट्स ह्या उपाध्या प्रदान करण्यात आल्या.महत्वाचे म्हणजे भारत सरकारने सरदार पटेल यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार *भारतरत्न* देऊन सन्मानित केलं. देशाप्रती जाज्वल्य राष्ट्रप्रेम अन् अस्सीम देशाभिमान बाळगणाऱ्या थोर स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंती दिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन ! जय हिंद
पत्रकार रणवीर राजपूत
गवर्मेंट मीडिया,म.शा.,मंत्रालय
(मो.न.९९२०६७४२१९)








