नंदूरबार l प्रतिनिधी –
अक्कलकुवा तालुक्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियानातील स्वयं सहायता समूहांना आर्थिक पाठबळ मिळावे व या आर्थिक मदतीतून उपजीविका आधारीत उपक्रम सुरु करून रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविन्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्षामार्फत सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्याला बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने दुजोरा दिला. अखेर खापर येथे दिव्यमणी इंग्लिश मिडीयम शाळेत बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अक्कलकुवा यांच्या संयुक्त विद्यमानाने बँक मेळावा संपन्न झाला.
बँक मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए.बी.विजयकुमार, जळगाव विभागीय क्षेत्रीय व्यवस्थापक रश्मी रेखापती, सहाय्यक क्षेत्रीय व्यवस्थापक नितीनकुमार पिंपळे, विभागीय अधिकारी विजय जाधव, स्वप्नील चोपडे, गोपाळ फंड, प्रणीत मित्तल, एलडीएम जयंत देशपांडे, नाबार्डचे डीडीएम प्रमोद पाटील, जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन उमेश अहिरराव, तालुका अभियान व्यवस्थापक मिनाक्षी वळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए.बी.विजयकुमार यांनी उपस्थित महिलांना उमेदने दिलेल्या दशसुत्रीचा अवलंब केल्यास त्यांची परिस्थिती निश्चितच सुधारेल, जसे कर्ज घेतात त्याचप्रमाणे परतफेड देखील करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आलेल्या सर्वच मान्यवरांनी मान्यवरांनी उपस्थित महिलांना आर्थिक समावेशन बाबत मार्गदर्शन केले. या मेळाव्यात अक्कलकुवा तालुक्यातील १६३ हून अधिक महीला स्वयं सहायता समूहांना २ कोटी १७ लक्ष रुपयांचे बँक कर्ज मंजूर करण्यात आले.
बँक मेळाव्याला ६०० पेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या. मेळाव्यात समूहातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंचे विक्री स्टॉल देखील लावले होते. स्टॉलवरील वस्तूंची खरेदी मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात केल्यामुळे महिलांचे मनोबल उंचावले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मृती डोंगरे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार नितीन पिंपळे यांनी मानले.
मेळावा आयोजनासाठी प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील व जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र अक्कलकुवा, कोराई व मोलगी शाखा अधिकारी व कर्मचारी तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील तालुका अभियान व्यवस्थापक मिनाक्षी वळवी, तालुका व्यवस्थापक निलेश वसावे, पिंकी वळवी, किशोर पवार, तसेच प्रभाग समन्वयक तुषार वळवी, अरविंद बागले, राकेश वसावे, संभाजी पावरा, योगेश जाधव, निखील शिर्के, राजेश राठोड, बलराम झांजरे आदींनी परिश्रम घेतले









