नंदुरबार l प्रतिनिधी
आपल्या भारतमातेच्या रक्षण करत असतांना आपल्या जीवाचीही पर्वा न करता सैनिकांनी देश रक्षण केले याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी सैनिकांना कृतज्ञता सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच ७५ विद्यार्थ्यांना ४५० वह्या वितरण करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्यचा अमृत महोत्सवनिमित्त हिंदु सेवा सहाय्य समितीने माजी सैनिकांसाठी कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. १३ ऑगस्ट रोजी लायन्स सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाची प्रारंभ भारतमाता प्रतिमा पूजन, ध्वजवंदन आणि राष्ट्रगीताने झाली. व्यासपीठावर प्रमुख म्हणून नंदुरबारचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उद्योगपती सुरेश अग्रवाल, प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. अनिल लोढा, माजी सैनिक आणि हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील उपस्थित होते. राष्ट्रभक्तीपर गीत आणि प्रार्थना बालधर्मसेविका जागृती पाटील हिने सादर केले.
यानंतर प्रमुख पाहुण्यांचा हस्ते माजी सैनिकांना कृतज्ञता सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले त्यात माजी सैनिक सर्वश्री अरविंद निकम, राजेंद्र तांबोळी, दिपक पवार, महेश सोनवणे, कैलाश शेवाळे, गुलाब बागुल, नरेंद्र बागुल, राजेश गिरणार, सुनील मुंडे, वसंत वाघ, गजानन रघुवंशी, ज्ञानेश्वर शिरसाठ यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्यावतीने बटर फ्लाय या लघुचित्रपटात उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाल्याबद्दल रणजितसिंह राजपूत यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी एम. के.रघुवंशी प्राथमिक शाळेचे ७५ विद्यार्थ्यांना ४५० वह्या मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आल्या. मनोगतात माजी सैनिक अरविंद निकम यांनी चायना वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करून जास्तीत जास्त तरुणांनी सैनिकात भरती होण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी माजी सैनिक नरेंद्र बागुल यांनीही आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचा उद्देश हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील यांनी तर सन्मानपत्राचे वाचन राजू चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन तुषार सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन पंकज डाबी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदेमातरम आणि घोषणांनी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवकांनी परिश्रम घेतले.








