नंदुरबार l प्रतिनिधी
भुरीवेल लघु पाटबंधारे योजना ता.नवापूर धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत 24 तासात वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी 107.00 मीटरची नोंद झाली असून प्रकल्प 100 पूर्ण क्षमतेने भरल्याने तसेच हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील 72 तासात पाऊस होण्याची शक्यता असल्याने
पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याने सुकी नदीच्या काठावरील भुरीवेल, थुवा, आमपाडा, खाटीजांबी, काटासवाण नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नदीकाठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.








