नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील निमदर्डा गावाजवळ ठेकेदाराने अर्धवट पुलाचे काम करून पळ काढल्याने पहिल्याच पावसात पर्यायी कच्चा रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जवळपास दहा गावांचा संपर्क तुटला आहे.

केशवफळी, देवळीपाडा, निमदर्डा, ओडसापाडा, मोतीजीरा, वागदी, पाटीलफळी या गावातील नागरिकांना विसरवाडी तसेच नवापूर येण्यासाठी निमदर्डा गावाजवळ नागण नदीवर उन्हाळ्यात पुलाचे काम सुरू होते.
परंतु ठेकेदार अर्धवट काम सोडून फरार झाल्याने पर्यायी कच्चा रस्ता नागन नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जवळपास दहा गावातील नागरिकांना विसरवाडी आणि नवापूर येण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या दहा गावातील विसरवाडी आणि नवापूर या ठिकाणी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी गैरसोय होणार आहे.
नवापूर तालुका तहसीलदार मिलिंद कुलकर्णी व बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन सदर पुलाचे काम त्वरित करावे. तसेच पर्यायी रस्ता देखील उपलब्ध करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.








