नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील दुर्गम,अति दुर्गम, वाड्या-वस्त्या पाड्यांवरील आदिवासी बांधवांना हक्काचं धान्य मिळावं यासाठी शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याला यश आले असून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जिल्ह्यात नवीन १६ स्वस्त धान्य दुकानांना मंजुरी दिलेली आहे.
माजी आ.चंद्रकांत रघुवंशी कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील दुर्गम भागात गेले असतांना अनेक भागातील वाडे पाडे वस्त्यांमध्ये ग्रामस्थांनी हक्काचं धान्य मिळत नसल्याची बाब निदर्शनास आली.
रघुवंशी यांनी नवीन स्वस्त धान्य दुकानांसाठी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून व प्रशासन स्तरावर वेळोवेळी निवेदने देऊन मागणी लावून धरली होती.
मागणीची दखल घेऊन जिल्ह्यातील पहाडपट्टीत असलेल्या दुर्गम अतिदुर्गम भागातील त्याचप्रमाणे सरदार सरोवर प्रकल्पाने वेढलेल्या गावांच्या परिस्थितीचा विचार करून आदिवासी भागातील किमान ५०० लोकसंख्येची अटी शिथिल करून विशेष बाब म्हणून १६ नवीन स्वस्त धान्य दुकानांना शासन स्तरावरून मंजुरी देण्यात आलेली आहे.
मंजुरीचे पत्र नुकतेच माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांना प्राप्त झाले आहे. स्वस्त धान्य दुकानांचे सर्व अधिकार हे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये हक्काचं रेशन मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांना मिळेल रोजगार
नवीन १६ स्वस्त धान्य दुकानांना मंजुरी मिळाल्याने स्थानिक स्वयंसहायता गट, सहकारी संस्था, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना दुकानांचे परवाने देण्यास प्राधान्य असेल.
तीन महिन्यात मंजुरीची प्रक्रिया
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना स्वस्त धान्य दुकान मंजूर करण्याचे सर्व अधिकार शासनाने वर्ग केले आहेत.१ जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत दुकान मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन शासनास अहवाल सादर करण्यात येणार आहे.
हक्काचं रेशन मिळणार
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा करून व शासन स्तरावर मागणी लावून धरल्याने जिल्ह्यातील दुर्गम भागासाठी १६ नवीन स्वस्त धान्य दुकानांना मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे वंचितांना त्यांच्या हक्काचं रेशन मिळणार आहे.
चंद्रकांत रघुवंशी,माजी आमदार