नंदूरबार l प्रतिनिधी
यावर्षी तापमानाने 46 अंश पर्यंत गाठले आहे . घाम , लोडशेडिंग याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची गोष्ट अशी घडणार आहे कि , या वर्षी मान्सूनचं आगमन वेळे आधीच होणार आहे . येत्या 27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे .
पोषक वातावरण राहिल्यास त्या पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात येऊन धडकणार आहे . केरळमध्ये मान्सून हा साधारणपणे 31 मे रोजी दाखल होतो . गेल्या वर्षी जूनमध्ये मान्सून दाखल झाला होता . आता या वर्षी आलेल्या चक्रीवादळाचा काही प्रमाणात मान्सूनवर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . त्यामुळे तब्बल पाच दिवस आधी मान्सून केरळमध्ये धडकणार आहे असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे . दरम्यान , यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे . यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होणार असल्यानं ही शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे .