नंदुरबार l प्रतिनिधी
मोठ्या शेतकरीकडे सालदार लावले जात असत, पुर्वी त्याची सुरवात अक्षय तृतीयाच्या दिवसापासून केली जात असे. सालदार निवडताना त्याला वर्षाची दिली जाणारी बोली लावली जायची. शिवाय सालदार गडीमध्ये किती ताकद आहे; याकरीता दगड उचलले जात होते. आज ही परंपरा नसली तरी परंपरेचा भाग म्हणून नंदुरबारमध्ये काही तरूणांनी त्याची प्रात्यक्षिक केली.
खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात अक्षयतृतीया या सणाला मोठं महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीमधील साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या सणानिमित्त पूर्वजांपासून विविध खेळ, गाणी सादर करून सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे झोके बांधून खेळणे, आखाजीचे गाणे म्हणणे व पूर्वजांना स्मरण करून पुरणपोळीचा नैवेद्य देणे. यासह नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात शेती कामासाठी सालदारकी गडी निवडण्यासाठी दगडाचे गोटे उचलण्याची परंपरा आहे. ज्या गडीने जास्त ताकत लावून आपली क्षमता दाखवेल त्याला जास्त दराने सालदारकी गडी ठेवत असल्याचे परंपरा आहे. आज आधुनिक युगात सालदारकी गडी ठेवत नसले; तरी वडिलोपार्जित चालत आलेली परंपरा माळीवाडा परिसरातील तरुणांनी प्रात्यक्षिक करून अक्षय तृतीय सणाचा आनंद लुटला. यावेळी माळीवाडा परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.