नंदुरबार l प्रतिनिधी
फिर्यादी दिलीप एल. पाडवी, रा. भूलाने, ता शहादा, यांनी आरोपी भावसिंग डी. भिल व इतर ४ सर्व रा. भूलाने, ता. शहादा यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन शहादा येथे भा.द.वि. कलम ३०२, ३०७, ३२४, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे नोंदविला होता. थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी व इतर लोकांनी आरोपी यांची मुलगी हिच्या लग्नासाठी फिर्यादीच्या मामेभाऊ चा मुलगा याच्यासाठी मागणी केली होती. परंतु आरोपीने मुलीचे लग्न दुसरीकडे केले होते. म्हणून वेळोवेळी वाद होत होता. घटनेच्या दिवशी आरोपी हे फिर्यादी यांच्या घरी आले होते. आरोपींच्या हातात लोखंडी गज, लाकडी दांडके व चेन असे प्राणघातक शस्त्रे होती. मुलगा विवाहित मुलीला फोन करून त्रास का देतो व इतर कारणास्तव म्हणून शिवीगाळ करुन मारामारीचे प्रकार झाले होते. मारून टाकण्याची धमकी दिली होती. आरोपी हे घटनास्थळातून पसार झाले होते. फिर्यादी व दुखापती यांना म्हसावद येथे सरकारी दवाखान्यात पाठविले होते. सर्वजण उपचार करून बरे वाटत असल्याने गावी परत आले होते. नंतर बरे वाटत नसल्याने परत खाजगी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी सरकारी दवाखान्यात पाठवल्यानंतर मयत घोषित केले होते. दि. २६ ऑगस्ट २०२० रोजी सर्व आरोपी त्यांना अटक करण्यात आली होती. आरोपीतांनी सत्र न्यायालय शहादा येथे जामीन अर्ज दोन वेळा दाखल केला होता. परंतु सत्र न्यायालय शहादा यांनी सदर आरोपीतांचा जामीन अर्ज नामंजूर करण्याचे आदेश पारित केले होते. सदर आदेशाविरुद्ध आरोपीतांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे फौजदारी जामीन अर्ज क्रमांक १५३/२०२२ ॲड. गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांच्या मार्फत दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद ( न्यायमूर्ती एम. जी. शेवलीकर) यांनी दि. १४ मार्च २०२२ रोजीच्या आदेशान्वये आरोपीतांना अटी व शर्ती सह जामीन मंजूर करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले.आरोपी तर्फे ॲड. गजेन्द्र देवीचंद जैन (भंसाली) यांनी काम पाहिले.










