नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या 29 एप्रिल 2022 रोजीच्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे जिल्ह्यातील 23 ग्रामपंचायतीमधील 33 रिक्त जागासाठी नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव जागा वगळून पोटनिवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आलेला आहे.
जिल्ह्यात पोटनिवडणूका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. तसेच या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही, असे उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे (महसूल प्रशासन) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.








