नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरीकांच्या मागासप्रवर्गास आरक्षण मिळणेकामी गठीत केलेल्या समर्पित आयोगासमोर निवेदनात्मक माहिती सादर करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी तत्सम नागरीक, संस्था, सेवाभावी संस्था, संघटना तसेच नोंदणीकृत राजकीय पक्षांनी निवेदन सादर करावीत, असे आवाहन भटके हक्क परिषद व अ.भा.महात्मा फुले समता परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाचा ग्रामविकास विभागाने दि.११ मार्च २०२२ रोजीच्या अधिसुचनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गास आरक्षणासाठी समर्पित आयोग गठीत केलेला आहे. सदर आयोग दिलेल्या कार्यकक्षेप्रमाणे, स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालिन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्याच्या अनुषंगाने ओबीसी समुहातील कुणबी, कुंभार, माळी, गुरव, तेली, तांबोळी, सोनार, शिंपी, न्हावी, धोबी, सुतार, लोहार, कासार, भावसार, गुजर, जव्हेरी, कलाल, मन्यार, मोमीन, पिंजारा, मुजावर आदींसह तत्सम ३४६ जाती व्हीजेएनटीमधील धनगर, वंजारी, बंजारा, भोई, गोसावी, गवळी, जोशी-गोंधळी, चित्रकथी, कंजर, बेलदार, लोहार, वडार, वैदू, गोपाळ, ओतारी, सिकलकर, छप्परबंदशाह आदींसह तत्सम संपूर्ण ५३ जाती तसेच एसबीसीतील कोळी, साळी, कोष्टीक, भंगी, मेहतर आदींसह तत्सम ७ जातीतील नागरीकांकडून, संस्थांकडून, सेवाभावी संस्थांकडून, संघटनांकडून व नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून अभिवेदन/सूचना मागवित आहेत. अभिवेदन/सूचना लेखी स्वरुपात dcbccmh@gmail.com किंवा +९१२२२४०६२२१ किंवा कक्ष क्र.११५, पहिला माळा, ए-१ इमारत, वडाळा, टर्मिनल, वडाळा आरटीओ जवळ, वडाळा, मुंबई-४०००३७ या पत्त्यावर दि.१० मे २०२२ पर्यंत पाठवावेत, असे आवाहन भटके विमुक्त हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष व अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष इंजि.रामकृष्ण मोरे व कार्याध्यक्ष एजाज बागवान यांनी केले आहे. निवेदनाची नमुनाप्रत ओमसाई झेरॉक्स (९८३४००२७२९) एलआयसी ऑफीस जवळ, नाट्य मंदिर समोर, नंदुरबार येथे उपलब्ध होईल.