नंदुरबार l प्रतिनिधी
कर्मचारी खरचं भाग्यवान आहेत की त्यांच्या सेवानिवृत्त समारंभ होत असतो. परंतु, आमच्या सारख्या राजकीय नेत्यांच्या सेवापुर्ती समारंभ होत नाही. नेते कधी निवृत्त होऊन जातील याच्या भरोसा नसतो. जनता जनार्दनात एवढी ताकद आहे की त्यांनी ठरवलं तर नेत्यांना रात्रीतून निवृत्त करू शकतात असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
नंदुरबार तालुका विधायक समितीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्त समारंभाचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी माजी आ.तथा संस्थेचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस यशवंत पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, समन्वयक डॉ.एम.एस रघुवंशी, प्राचार्य डॉ.व्ही.एस श्रीवास्तव, उपप्राचार्य डॉ एम.जे रघुवंशी, प्रा.डॉ एम.एस रघुवंशी, प्रा एन.जे सोमानी उपस्थित होते.
याप्रसंगी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष मनोज रघुवंशी व सरचिटणीस यशवंत पाटील यांच्या हस्ते प्रा.डॉ.राजेंद्र कासार,प्रा.अशोक शेवाळे, प्रा.विलास अहिरराव प्रा.सुनिल चौधरी,राजेंद्र भाऊराव पाटील,दिनेश रघुवंशी,देविदास वाघ,महादू भिमाजी गवळी,सुरेश साळवे,मालचंद्र चौधरी,प्रा.डॉ.अरविंद देसले या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधव कदम तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ.यु.जे धगधगे यांनी केले.
प्रेरणेचे प्रकाशन
संस्थेच्या जीटीपी महाविद्यालयाच्या प्रेरणा नियतकालिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रेरणा नियतकालिका महाविद्यालयीन युवकांच्या विचार,जाणिवा, संवेदना, भावना,दृष्टिकोन,अनुभव इत्यादींच्या उत्स्फूर्त आविष्कारास संधी देणारे एक महत्त्वपूर्ण विचार विचार मंच असून सोबतच महाविद्यालयात संपन्न होत असलेल्या शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांच्या घटनाक्रम हे त्यातून प्रतिबिंबित होते.








