नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील वन हक्क दावेदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काल नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथून 50 किलोमीटर लांब अंतर नंदुरबार येथे निघालेला पायी बिऱ्हाड मोर्चा आज नंदुरबार शहरात दाखल झाला आहे जवळपास पाच हजार पेक्षा अधिक वन हक्क दावेदार शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहे. वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी हजारो पुरुष व महिला शेतकरी आपल्या डोक्यावर आपलं बिर्हाड घेऊन नंदुरबार शहरात दाखल झाले आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
नंदुरबार शहर पोलीस ठाण्या समोरील सुभाष चौकात सभेचे आयोजन करण्यात आले आहे, या सभेनंतर मोर्चेकरी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करणार आहे. गेल्या 15 वर्षापासून वन हक्क कायद्याची योग्य रीतीने अंमलबजावणी झालेली नाही गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात कोरोनाचा धाक दाखवून घरात कोंडून सर्वात जास्त वन हक्क दावेदारांचे निकाल अपात्र ठरवले आहे. जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी चर्चेला ही वेळ देत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पाच हजार पेक्षा अधिक संख्येने पन्नास किलोमीटर लांब पायी बिर्हाड मोर्चा काढून धडक दिली आहे. यावर आता प्रशासन काय भूमिका घेणार तसेच प्रशासनाने मोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास मोर्चेकरी काय पाऊल उचलतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे.