तळोदा l प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे खून प्रकरणात आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांनी आरोपी भुर्जी पावरा, रा.तळोदा, जिल्हा नंदुरबार, यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन तळोदा येथे भा. द. वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंदविला होता. थोडक्यात माहिती अशी की, गावकऱ्यांनी फिर्यादी यांना कळवले की, त्यांच्या शेतात एक अनोळखी इसम, नाव गाव माहित नाही, शेतात मरून पडलेला आहे. त्याने मेलेल्या अनोळखी इसमाची खात्री केली. त्यानंतर फिर्यादी व इतर लोक घटनास्थळ येथे पोहोचून पाहिले की, कोणीतरी अज्ञात आरोपीताने अज्ञात कारणासाठी जीवे ठार मारलेले दिसले. अनोळखी इसमाचे वर्णन देण्यात आले. अज्ञात आरोपी त्याच्या व सदर मयत इसमांचे नाव व वारसांच्या जवळपास शोध घेतला होता. परंतु मिळून न आल्यामुळे तळोदा पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यासाठी पोहोचले. त्यानंतर पुरवणी जबाब नोंदविण्यात आला की, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृत व्यक्तीला ओळखले. तसेच माहिती मिळाली की, मृत व्यक्ती व आरोपी यांच्यामध्ये मोटर सायकल खरेदी करण्यासाठी काही रक्कम अर्जदार/ आरोपी याच्याकडे बाकी होती. पैशाची मागणी केल्यामुळे त्यांच्यात वाद विवाद झाले होते. त्यामुळे त्यांनी सदर गुन्हा केला असे आरोप लावण्यात आले होते. सदर अर्जदार /आरोपी यांची दि. १९ जानेवारी २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. नंतर आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. अर्जदार,आरोपी यांनी सत्र न्यायालय, शहादा, येथे जामीन मिळविण्यासाठी दोन वेळेस अर्ज दाखल केला होता. परंतु, सत्र न्यायालय, शहादा, यांनी जामीन अर्ज नामंजूर करण्याचे आदेश पारित केले होते. अर्जदार / आरोपी यांनी सदर आदेशाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ॲड. गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांच्यामार्फत जामीन अर्ज क्रमांक १३१४/२०२१ दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद ( न्यायमूर्ती एम. जी. शेवलीकर) यांनी दि. ४ जानेवारी २०२२ रोजी सुनावणी घेऊन सदर जामीन अर्ज सशर्त मंजूर करण्याचे महत्वपूर्ण आदेश पारित केले. अर्जदार /आरोपी तर्फे ॲड. गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांनी काम पाहिले.








