नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार येथील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयमध्ये शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक, शैक्षणिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी नंदुरबार तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी चौरे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती सोहळ्याचा औपचारिक प्रारंभ झाला.
विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमान आणि राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या या कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनकार्याचा वेध घेणारी प्रभावी सादरीकरणे केली. वैष्णवी कदम या विद्यार्थिनीने अभ्यासपूर्ण व ओघवत्या भाषेत शिवरायांवरील आपले विचार मांडत उपस्थितांना प्रेरित केले. त्यानंतर प्रज्ञा पावरा हिने सादर केलेल्या जोशपूर्ण शिवगर्जनेने सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
मृणाली भामरे हिने जिजाऊंच्या जीवनावर आधारित सादर केलेल्या एकपात्री प्रयोगातून मातृसंस्कारांचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित केले. यानंतर गटशिक्षणाधिकारी चौरे साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग उदाहरणादाखल सांगत शौर्य, नेतृत्व, शिस्त, स्वावलंबन व राष्ट्रनिष्ठा हे गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरला तो पावनखिंड प्रसंगावर आधारित नाट्यप्रयोग. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या नाट्यात बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचे जिवंत चित्रण करण्यात आले. थरारक संवाद, प्रभावी अभिनय व नेपथ्यामुळे प्रेक्षकांना इतिहासाचा साक्षात अनुभव मिळाला.
कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी “राज आलं, राज आलं, जिंकूनिया…” या गीतावर सादर केलेल्या समूह नृत्याने कार्यक्रमात रंगत भरली. याशिवाय स्वसंरक्षणासाठी लाठी संचालनाचे प्रात्यक्षिक वैष्णवी कदम हिने सादर केले. मर्दानी खेळाच्या या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक थक्क झाले.
या प्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांनी विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील आदर्श गुण अंगीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षक मीनल वळवी, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक छोटू बोरसे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद दीक्षित यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिशा सोनवणे, गायत्री पाटील, रचिता सुतार, अपर्णा पाटील, रोजलीन यंगड आदींनी विशेष परिश्रम घेतले.
शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारा हा शिवजयंती उत्सव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.








