नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या घरकुलांच्या आढावा बैठकीत ग्रामस्थांनी तक्रारींच्या पाऊस पाडल्याने जिल्हा परिषद सभागृह चिंब झाले होते. योजनेच्या लाभ मिळवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने आमदारांनी प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले आहेत.यापुढे दर महिन्याला तालुकानिहाय योजनेची आढावा बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व आदिवासी विकास विभागाचा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून घरकुल योजना राबवण्यात येत असते. शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी,आ.राजेश पाडवी,आ. आमश्या पाडवी यांच्या मागणीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी बैठकीचे आयोजन केले होते.
दुपारी १ वाजता सुरू झालेली बैठक साधारणता पावणेचार वाजेपर्यंत सुरू होती. व्यासपीठावर शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी,आ.राजेश पाडवी,आ. आमश्या पाडवी,मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक गावडे उपस्थित होते. बैठकीला उपस्थित जिल्हाभरातून आलेल्या ग्रामस्थांनी घरकुल प्रश्नावर गंभीर आरोप केले. ग्रामपंचायत स्तरावर घरकुल योजनेला पात्र असल्याच्या ठराव करण्यात येतो.परंतु, पंचायत समिती स्तरावर लाभार्थ्यांच्या फायली गायब होत असतात. घरकुलाची प्रकरणे मंजूर असताना देखील लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे येत नाहीत. योजनेच्या लाभ मिळवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी बैठकीत करण्यात आल्या.
ते आदेश फेक होते का; आ.चंद्रकांत रघुवंशींच्या सवाल
योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळावा हा नागरिकांचा हक्क असतो. पैसे घेतल्याशिवाय योजनेच्या लाभ मिळत नाही अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी लाभार्थ्यांना आदेशांचे वितरण करण्यात आले असताना लाभार्थ्यांना अद्याप पर्यंत लाभ मिळाला नसल्याने ते आदेश फेक होते का असा संतप्त सवाल करीत ८ दिवसात निर्णय न झाल्यास अधिवेशनात प्रश्न उपस्थित करू असे आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.
अधिकारी लोकप्रतिनिधींना खोटी माहिती देत असतात. पैसे दिल्याशिवाय घरकुल योजनेच्या लाभ मिळत नाही. योजनेच्या माध्यमातून जर प्रशासनाची बदनामी होत असेल तर संबंधितांची हकालपट्टी करा अशी मागणी आ.आमश्या पाडवी यांनी केली.
घरकुल योजनेच्या बाबतीत जिल्हाभरातून तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. लाभार्थ्यांच्या खात्यांवर कोणाला हप्ता आला तर कोणाला नाही.यापुढे प्रत्येक महिन्याला तालुकास्तरावर आढावा बैठक होईल.योजनेचा लाभासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याच्या तक्रारी देखील आल्या. दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे आ.राजेश पाडवी यांनी सांगितले.