नंदुरबार l प्रतिनिधी
मावसा-मावशीचे भांडण सुरू असताना ते सोडविण्यासाठी गेलेल्या एकाने मावशाला लाकडी बॅटने बेदम मारहाण केल्याने त्याचा उपचार घेताना मृत्यू झाल्याची घटना लेघापाणी (ता. शहादा) येथे घडली. दरम्यान, या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
याबाबत म्हसावद पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास अटक करण्यात आली आहे. कंज्या ऊर्फ कांजऱ्या कन्या भिल (28, रा. कोटबांधणी, ता. शहादा) असे मृताचे नाव आहे, तर मंगलाल चंद्रसिंग भिल (20, रा. लेघापाणी) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनुसार, कोटबांधणी येथील कांजऱ्या भिल हा 11 मे रोजी त्याच्या सासरी लेघापाणी येथे गेला होता. तेथे त्याने त्याच्या पत्नीकडे असलेले 15 हजार रुपये खरीप हंगामासाठी बियाणे आणि खतांसाठी मागितले. त्यावरून कांजऱ्या व त्याच्या पत्नीमध्ये वाद होऊन भांडण झाले. मावसा व मावशीचे सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी मंगलाल चंद्रसिंग भिल हा युवक तेथे गेला. भांडण सोडवीत असताना त्याचा राग अनावर झाल्याने त्याने लाकडी बॅटने मावसा कांजऱ्या भिल याला बेदम मारहाण केली.
पोटात आणि कमरेवर मारहाण केल्याने तो जबर जखमी झाला. त्याला तातडीने म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला.
याबाबत भिलसिंग भिल यांनी फिर्याद दिल्याने मंगलाल भिल याच्याविरुद्ध म्हसावद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत.