नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील शेत शिवारामध्ये शेतकरी कृष्णा झगा वाघ यांच्या दोन एकर क्षेत्रातील पिकवलेला ४० क्विंटल मका जळून राख झाल्याची घटना दि.३० एप्रिल रोजी घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच सरपंच राजू मराठे यांनी पाहणी करून संबंधित महसूल विभागाशी संपर्क साधून माहिती दिली असता दि.१ मे रोजी प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे तसेच विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांनी ही घटनास्थळी येऊन आग लागलेल्या मक्याची पाहणी केली आहे. शेतकरी कृष्णा वाघ यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचा 40 क्विंटल मका जळून नुकसान झाले आहे.
नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही मात्र मका ज्या जागेवर साठवून ठेवलेला असता त्या नजीकच वीज तारा असल्याने विद्युत तारांचा घसरण झाल्याने ठिणगी पडून आग लागली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. मकईला आग लागताच परिसरातील शेतकरी व कृष्णा वाघ यांच्यासह त्यांची मुल यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला असता मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते.
त्यातच कडाक्याचे ऊन असल्याने आग विझवण्यास अडचणी येत होत्या मात्र मिळेल त्या साधनांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत मका पूर्ण जळून खाक झाला. शेतकरी कृष्णा वाघ यांचे अतोनात नुकसान झाल्याने ऐन हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.