नंदुरबार l प्रतिनिधी
शहर व जिल्ह्याचे ऐतिहासिक वैभव ठरलेल्या माणिक चौकातील हुतात्मा स्मारकाचे पावित्र्य राखण्यासाठी नगर पालिकेसह सुजान नागरिकांनी गांभीर्य राखावे अशी विनंती शालेय विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शहीद शिरीषकुमार मेहता यांची दि. 28 डिसेंबर रोजी 97 वी जयंती असून पूर्व संध्येला निवेदन देण्यात आले. मुख्याधिकारी अमोल बागुल कार्यालयीन कामानिमित्त मुंबईला असल्याने विद्यार्थ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांशी प्रखर लढा देऊन देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद बाल हुतात्म्यांमुळे नंदुरबारचे नाव संपूर्ण देशात ओळखले जाते. नंदनगरीच्या हुतात्मा शिरीषकुमार मेहता व सहकाऱ्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या माणिक चौकातील हुतात्मा स्मारकाला भेटी देण्यासाठी अनेक मान्यवर अतिथी येत असतात. मात्र सध्या स्मारकाभोवती मोकाट गुरे आणि वाहनांचा गराडा असल्यामुळे स्मारकाचे पावित्र्य धोक्यात आले आहे.
याच ठिकाणी मोकाट गुरांना चारा टाकण्यासाठी पुण्यकर्म करणाऱ्या नागरिकांना मज्जाव करणे गरजेचे आहे. नगर पालिका प्रशासनाने चारा विक्री करणाऱ्यांना अन्यत्र जागेवर स्थलांतरित करावे. याशिवाय स्मारकाभोवती वाहन पार्किंग करणाऱ्यांवर नगर पालिका किंवा वाहतूक विभागातर्फे कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. केवळ 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 9 सप्टेंबर शहीद दिन या तीन दिवशी ध्वजारोहणापुरते स्मारक परिसरात स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात येते. परंतु या तीन दिवसाऐवजी वर्षभर 365 दिवस हुतात्मा स्मारकाचे पावित्र्य राखून परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. याशिवाय माणिक चौक परिसरातील रहिवासी तथा व्यापारी वर्गाने शहिदांच्या बलिदानाची जाणीव ठेवून स्मारकाची स्वच्छता आणि काळजी घेणे आवश्यक आहे.
असेही विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटले आहे. शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सदस्य गोपाल हिरणवाळे, कृष्णा संजय चौधरी, धीरेन सुदाम हिरणवाळे, वैभव पावभा वाडीले या शालेय विद्यार्थ्यांनी नगर पालिका प्रशासनास निवेदन दिले.








